भाजपचं पुन्हा धक्कातंत्र! केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; अनेक दिग्गजांचा पत्ता कट होणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपमध्ये आता संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी महत्त्वाची मानली जात आहे. पण याचदरम्यान,भाजपच्या (BJP) पक्षश्रेष्ठींनी दिल्लीतून मंगळवारी(ता.22) एक मोठा निर्णय घेतला अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
भाजप हा पक्ष नेहमी धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी,आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी नेमण्यात आलेले निरीक्षक हेही उपस्थित होते.याच बैठकीतून शिवप्रकाश यांनी एक धडाकेबाज निर्णय समोर आला आहे. यामुळे अनेक दिग्गजांचा पत्ता कट होणार आहे.
याचवेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं आजी,माजी आमदार,खासदार यांना मोठा झटका दिला आहे. आजी,माजी आमदार,खासदार यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आता जिल्हाध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती जमातीच्या कमीत कमी 20 टक्के अध्यक्ष महिला असायला हव्यात अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत पोहोचले तरी चालणार असल्याचंही भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी म्हटलं आहे. संघटनमंत्री शिवप्रकाश यांनी मुंबईतील बैठकीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना तत्काळ कुठलेही मोठे पद दिले जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. संघटनेसाठी वर्षानुवर्षे योगदान देत असलेल्या निष्ठावंतांची पक्षात यापुढेही घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा व्यक्तींकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिले जाण्याची शक्यता आहे.भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महाराष्ट्रात नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा होण्याची चर्चा आहे. त्याआधी भाजपनं जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या मनावर घेतल्या आहेत. भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या निवडीकरिता नियुक्ती करण्यात आलेले निरीक्षक सर्वात पहिल्यांदा त्या त्या जिल्ह्यांत जाऊन नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. या नेते,कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षपदासाठी पसंतीक्रम घेतला जाणार आहे.ज्या तीन नावांना सर्वाधिक पसंती मिळालेल्या नावांची यादी निरीक्षकांकडून प्रदेशाध्यक्षांकडे 30 एप्रिलपर्यंत सोपवण्यात येणार आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांकडून 5 मे पर्यंत जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या जाहीर केल्या जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे भाजपकडून जिल्हाध्यक्षपदांच्या नियुक्तीसाठी नेमण्यात आलेल्या निरीक्षकांनी ज्या तीन जणांचं पॅनेल तयार करतील त्यात महिलांमधून एक आणि अनुसूचित जाती-जमातींतून एक नाव असलेच पाहिजे, असा नियम करण्यात आला आहे. केंद्रीय नेतृत्वानं संघटनात्मकदृष्ट्या जिल्हे वाढविण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.सध्या भाजपचे संघटनात्मक पातळीवर राज्यात तब्बल 78 जिल्हे असूनही ही संख्या वाढविण्याची मागणी प्रदेश भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाकडे करण्यात आली होती.मात्र,ती फेटाळण्यात आल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना मुदतवाढ देण्यात आली होती. पण आता राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. आता लवकरच भाजपला नवीन अध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता आहे.मात्र,आता राष्ट्रीय अध्यक्षांसह पक्षसंघटनेतील बदलाचे वारे हे भाजप आणि आरएसएसच्या नेतृत्वात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपकडून पाच-सहा राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होताच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू होण्याची शक्यता आहे.या आठवड्यात उत्तर प्रदेश,कर्नाटक आणि झारखंडसह काही राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुका पूर्ण होण्याची शक्यता आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जवळपास सहा नावाची चर्चा आहे. त्यामध्ये एक नाव महाराष्ट्रातील आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान,विनोद तावडे,शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, डी. पुरंदरेश्वरी या ज्येष्ठ नेत्यांची नावे सध्या आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.