साई संस्थानकडून मंदिरातील भोजनाबाबत मोठा निर्णय; सुजय विखेंच्या मागणीनंतर उचललं पाऊल
साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारी मोफत भोजन व्यवस्था यापुढे केवळ भाविक व संस्थान रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीच असेल. अन्य नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. आज गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. भाविकांना प्रसाद भोजन घेणे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
काही लोक भोजनालयात मद्यपान करून येत असल्याचं, तसंच भोजनानंतर परिसरातच धूम्रपान करत असल्यामुळे साईभक्तांना त्रास होतो. यासारख्या अनेक तक्रारींमुळे प्रशासनाने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसादालयात सध्या रोज ४० ते ४५ हजार भाविक मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या बाहेर उदी-प्रसाद वाटप काउंटरजवळ मोफत भोजनाचे कूपन दिले जाईल, ते दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रवेश मिळेल. मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक मोफत प्रसाद भोजनाचे तिकीट दिले जाईल, असे गाडीलकर यांनी सांगितले.
कशी असेल व्यवस्था?
संस्थान भाविकांसाठी निवासस्थानातील निवासस्थानातील स्वयंसेवी भोजन कक्षामध्ये रूमची पावती, चावी दाखवून प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील नातेवाइकांसाठी केसपेपर, अॅडमिट कार्ड दाखवून द्वारावती भक्तनिवास येथील प्रसाद भोजन कक्ष, मुख्य प्रसादालयात प्रवेश दिला जाईल. शालेय सहली, पालखी पदयात्रींसाठी प्रसादालय अधीक्षक खातरजमा करून विद्यार्थ्यांना, पदयात्रींना लेखी पत्र घेऊन प्रवेश देतील. नाश्ता पाकिटाचे कुपनही सकाळी दर्शनरांगेत देण्यात येणार आहेत. ते कूपन संबंधित काउंटरवर दाखवून तेथे पैसे भरून नाश्ता पाकीट मिळेल.सुजय विखे यांनी केली होती मागणी
मोफत भोजनामुळे भिक्षेकरी व गुन्हेगार वाढल्याने भाविकांशिवाय इतरांसाठी मोफत भोजन बंद करावे, अशी मागणी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.