महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. पण या निकालावर अनेकांनी संशय व्यक्त केला. यानंतर ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप सातत्याने महायुतीवर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टात ईव्हीएम
विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.
या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य
निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत
संध्याकाळी 6.00 नंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी
आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली
होती. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रकाश आंबेडकरांनी बाजू
मांडली. त्यांनी कोर्टात ईव्हीएमबद्दलच्या याचिकेवर युक्तीवाद केला.
न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली.
6 नंतर निवडणूक विभागाने व्हिडीओग्राफी केली का?
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मतदानासंदर्भात संध्याकाळी ६ नंतर रिटर्निंग आफिसर यांनी नियमांचे योग्यरित्या पालन केले नाही, असा आरोप केला. निवडणूक आयोगाने सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडीओ द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर झालेल्या 76 लाख मतदानावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी संध्याकाळी 6 नंतर निवडणूक विभागाने व्हिडीओग्राफी केली का? असा सवालही केला.निवडणूक आयोगाने आदर्श नियमावलीचं पालन केलं नाही. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी आणि यंदा सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी यात मोठा फरक आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती कमल खाता यांच्या द्वीसदस्य खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
2 आठवड्यानंतर सुनावणी
यानंतर मुंबई हायकोर्टाने राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. येत्या २ आठवड्यानंतर या याचिकेवर पुढील सुनावणी पार पडणार आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
“यात सहानंतर झालेलं मतदान आणि स्लीपचा रेकॉर्ड आहे. त्यावर निवडणूक आयोगाचं उत्तर होतं, आमच्याकडे माहिती नाही. निकालात पोल मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतांची जुळवणी झाली पाहिजे. रिटर्निंग अधिकाऱ्याने माहिती दिली आहे का? जिथे फरक आहे त्याची माहिती दिली आहे. आज चीफ निवडणूक आयुक्त, राज्य मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे”, अशी माहिती प्रकाश आंबडेकर यांनी दिली. “यासाठी दोन आठवड्याची मुदत दिली आहे. सहानंतर मतदानाची नियमावली आहे, ती पाळली गेली का? रांगेतील शेवटच्या माणसाला पहिला नंबर दिला जातो. पहिल्याला शेवटचा नंबर मिळतो. निवडणूक आयोगाकडून आम्ही माहिती मागितली होती. तेव्हा निवडणूक आयोगाने माहिती उपलब्ध नाही. इतरही राजकीय पक्षांनी आणि जनतेने सहभागी झाले तर निवडणूक आयोगाला ॲक्शन घ्यावी लागेल. निवडणूक आयोग म्हणतंय की निवडणुका झालेलं आहे ते आता आम्हाला कळेल”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.