राज्यसभेतील खासदार विजय साई रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांचे सरकारमध्ये उपायुक्त असलेल्या माझ्या पत्नीशी अफेअर असून एक मुलही आहे, असे आरोप करत पतीने दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. रेड्डी हे वायएसआर काँग्रेसचे नेते आहेत. आंध्र प्रदेशातील मदन मोहन मणिपट्टी यांनी बुधवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे विजय साई रेड्डी यांच्याविरोधात आंदोलन केले. त्यांची सदस्यत्व रद्द करण्याची मागणी मणिपट्टी यांनी केली आहे. त्यांची पत्नी आंध्र प्रदेश सरकारमध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत आहे.
मणिपट्टी यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, विजय साई रेड्डी यांनी माझ्या पत्नी पळवून नेले असून त्यांना एक बेकायदेशीर मुलही आहे. माझी पत्नी आंध्र प्रदेश सरकारमध्ये उपायुक्त आहे. राज्यसभेचे खासदार, आंध्र प्रदेशात हायकोर्टात सरकारची बाजू मांडणारे विजय साई रेड्डी यांनी पत्नीशी साटेलोटे करून अनेक बेकायदेशीर कामे केली आहेत, असे गंभीर आरोप मणिपट्टी यांनी केले आहेत.
कोट्यवधींची जमीन त्यांनी बळकावली आहे. त्यांनी मोठा घोटाळा केला आहे. माझ्या पत्नीपासून त्यांना मुल आहे. त्यामुळे त्यांची डीएनए टेस्ट करावी आणि त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी मणिपट्टी यांनी केली आहे. आंदोलनादरम्यान मणिपट्टी यांच्यासोबत असलेले जेएसी अध्यक्ष सुभाष चंद्र बोस म्हणाले, एका आदिवासी महिलेला विजय साई रेड्डी यांनी ब्लॅकमेल केले आहे. त्यांना धोका दिला आहे. त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. त्यांनी आपली ताकदीचा उपयोग करून कोट्यवधींची जमीन बळकावली आहे.महिलेला झालेल्या मुलाचे वडील कोण आहेत, हे माहिती नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रपती आणि अध्यक्षांना भेटून रेड्डी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार आहोत. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी पैशांचा वापर करून हे सगळं मॅनेज करत असल्याचे बोस म्हणाले. दरम्यान, विजय साई रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वीचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.