राज्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यालाही पुराचा धोका निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून कृष्णा आणि वारणा नदीला पाण्याची पातळी वाढली आहे.
कृष्णा आणि वारणा नदीचे पात्र बाहेर पडले आहे. कृष्णा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून जिल्हा कारागृहातील कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
सांगलीत पाऊस थांबेना
सांगलीच्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे. आज सकाळी ७ वाजेपर्यंत कृष्णेची पातळी 36.2 फुटांवर पोहचली आहे तर 40 ही इशारा तर 45 फूट ही धोक्याची पातळी आहे.
कृष्णानदीची पातळी ३६ फुटांवर
पाणी पातळी वाढल्यामुळे शेरीनाल्याच्या माध्यमातून आता कृष्णेचे पाणी शहरातील सखल भागात शिरू लागले आहे,कर्नाळ रोडवरील पुल आता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नांद्रे-पलूसकडे जाणारी वाहतूक अन्यमार्गाने वळवण्यात आली आहे. तसेच काकानगर परिसरातील नागरिकांनी आता स्थलांतर सुरू केले आहे. वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर शिराळा, पलूस, वाळवा आणि मिरज तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली.
प्रशासन अलर्ट
दरम्यान, कृष्णा नदीच्या वाढती पाण्याची पातळी लक्षात घेता जिल्हा कारागृहामधील कैद्यांचे स्थलांतर करण्यात येत आहे. राजवाडा चौक या ठिकाणी असलेल्या जिल्हा कारागृहात जवळपास ४०० कैदी आहेत. त्यापैकी सध्या ८० कैद्यांची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यामध्ये ६० पुरुष आणि २० महिला कैद्यांचा समावेश आहे.याआधी २०१९, २०२१ च्या महापुरामध्ये कारागृहाला देखील फटका बसला होता. त्यावेळी कैद्यांना बाहेर काढताना प्रशासनाची मोठी दमछाक झाली होती. त्या पार्श्वभूमीवरखबरदारीचा उपाय म्हणून कारागृह प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.