सांगली: सांगली जिल्ह्यातील जत आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांना हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. अनिल बाबर यांना न्यूमोनिया झाल्यानंतर सांगलीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज (31 जानेवारी) त्यांची प्राणज्योत मालवली. निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचत आमदार अनिल बाबर यांच्या कुटुबीयांचे सांत्वन केले. आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने विटा खानापूर-आटपाडी मतदार संघावर शोककळा पसरली आहे.
रुग्णालयातून आमदार अनिल बाबर यांचे पार्थिव विटामधील घरी आणण्यात आले. त्यानंतर विटा शहरातून गार्डीकडे अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेनंतर बाबर यांच्या पार्थिवावर गार्डी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. गार्डीमध्ये जीवन प्रबोधिनीच्या मैदानावर बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार विश्वजित कदम अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनिल बाबर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली.
राज्यात कुठेही गेलो तरी अनिल भाऊंची माणसं भेटायची
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, कमी बोलून साधी राहणी असं अनिल बाबर यांचं व्यक्तीमत्व होतं. राज्यात कुठे ही गेलो तरी अनिल भाऊंची माणसं भेटायची. त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी खूप काम केले. अनेक संस्था उभा केल्या. सर्वसामान्य माणूस कसा असतो हे दाखवून दिले. निवडणूक येताच अनेक परकाष्ठ कराव्या लागतात, पण लोकांनी त्यांना निवडून दिले. या लोकांच्या ऋण फिटणार नाही असे ते म्हणायचे.पाण्यासाठी खूप कष्ट केले पाणीदार आमदार त्यांना म्हटले जात होते. पत्नी विरह त्यांनी सहन केला होता. त्याचे कुटुंब दुःखाच्या छायेत सापडलं आहे. टेम्भू योजनेसाठी त्यांनी जे काही केले हे सर्व आपण पाहिले आहे. कारण लोकांना पाणी मिळण्यासाठी नागपूर कॅबिनेटच्या बाहेर बसून होते. आम्ही मंजूर केले तेव्हा त्यांचा आनंद मोठा होता. आमदार काय करायला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले आहे. माणूस किती जगला पेक्षा कसा जगला याला महत्व आहे. यांची किर्ती आजन्मआपल्या स्मरणार्थ राहील. त्यांनी जे काही काम केले पुढे न्हेने हीच खरी श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्र सरकारच्या वतीने श्रद्धांजली देत असताना शासन बाबर यांच्या पाठीशी आहे. आम्ही दुःखात सहभागी आहोत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.