"...म्हणून मी जीवन संपवतोय", त्रास देणाऱ्यांची नावं लिहून फेसबूक पोस्ट करत शिक्षकाचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं
बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीची मालिका अजूनही थांबायचा नाव घेत नाहीये. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर अनेक अशी प्रकरणं समोर आली, ज्यामध्ये गुन्हेगारांचे क्रूर रूपं समोर आलेले दिसले होते. त्यानंतर आता पुन्हा एका घटनेनं बीड हादरलंय. एका शिक्षकाने बँकेच्या बाहेर फाशी घेऊन, स्वत:ला संपवलं. तसंच टोकाचा निर्णय घेण्याआधी गंभीर आरोप करत एक फेसबूक पोस्टही टाकली.
"हे लोक मला हाल हाल करुन मारतील..."
बीड शहरातील कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेडच्या केज शाखेजवळ ही घटना घडली. धनंजय अभिमान नागरगोजे या 30 वर्षीय शिक्षकाने स्वत:चं आयुष्य संपवताना लिहिलेल्या पोस्टमध्ये आरोपींच्या नावाचाही उल्लेख केला आहे. केज तालुक्यातील देवगावमध्ये राहणाऱ्या धनंजय नागरगोजे यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अनेक फेसबूक पोस्ट केल्या. "हे लोक मला हाल हाल करुन मारतील, मोठे लोक मला मारतील, मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही" अशा अनेक पोस्ट धनंजय नागरगोजे यांच्या फेसबूकवर टाकलेल्या दिसल्या. तसंच स्वत:ला संपवण्याआधी एक सविस्तर पोस्ट करत आपल्या मुलीची माफी मागितली आणि त्रास देणाऱ्यांची नावंही लिहिली आहेत.
धनंजय नागरगोजेंची शेवटची फेसबूक पोस्ट...
"श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही .कधी मी कुणाला दोन रू ला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे .तुला आजुन काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला लवागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे.
विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल हाल करून मरणार आहेत. मला मारण्याचं करणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की ,मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली आणि तीतून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सूर्वात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकणी ठेवला नाही .
बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही. श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लयकीचो नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला. विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड, हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत .कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवित आहे. आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे. सर्वांना माझा शेवटचा राम राम"
नेमकं काय होतं त्रासाचं कारण?
धनंजय नागरगोजे हे केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक होते. 2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे धनंजय नागरगोजे अडचणीत होते. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्याचं समजतंय. एकूणच, या घटनेनंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.