मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची जाहिरात भाजपने आज जवळपास सर्वच वर्तमानपत्रात दिली आहे.
शपथविधी सोहळा महायुतीचा की भाजपचा असा सवाल जाहिरात पाहिल्यानंतर उपस्थित होतो. या जाहिरातीवरुन चर्चा सुरू असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील टीका केली आहे. जाहिरातींमध्ये वरील बाजूला महापुरुषांचे फोटो छापले आहे. यामध्ये शाहू महाराजांचा फोटो न झापल्याने संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला आहे.
संभाजीराजे म्हणाले, जाहिरातीमध्ये महापुरुषांची फोटो छापले मात्र शाहू महाराजांचा फोटो छापला नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही. महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही भाजपने ही चूक दुरुस्त करावी.
देवेंद्र फडणवीसांना माझ्या शुभेच्छा, असं का म्हणाले संभाजीराजे?
निवडणुकीमध्ये हार जीत होत असते देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा. पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्र सुपर पॉवर कसं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणत्याही राज्याला इतका इतिहास नाही तितका इतिहास महाराष्ट्राला आहे. त्यामुळे नवीन महाराष्ट्र घडवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात असावा ही माझी अपेक्षा आहे, असे देखील संभाजीराजे म्हणाले.ईव्हीएम बद्दल अनेक पक्षांचे वेगवेगळे तर्क आहेत. त्यामध्ये न पडता आता पुढे कसं जाता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. केंद्रात आणि राज्यात आता तुमच्याकडे सत्ता आहे त्यामुळे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक प्राधान्याने सोडवावे. जे जे शब्द दिले होते ते आता त्यांनी पुन्हा एकदा सोडवावे. तसेच मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकवणार हे सरकारने सांगावे. ते टिकणार नसेल तर मग मराठा समाजाला कसे आरक्षण देणार हे सांगणे गरजेचे आहे. माझा काही सल्ला मागितला तर याबाबत मी सल्ला द्यायला तयार आहे , असेही संभाजीराजे म्हणाले.
मराठा आरक्षण का गेले, संभाजीराजेंनी सांगितलं कारण...
संभाजीराजे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करेक्ट टाइमिंगला वकील न दिल्यामुळे आरक्षण गेले. दोनदा एससी, ओबीसी आरक्षण उडाल्यामुळे तिसऱ्यांदा कशा पद्धतीने टिकेल हे मराठा समाजाला सांगितलं पाहिजे. सगळ्या समाजाचे प्रश्न कसे सोडवायचे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता तुमच्याकडे पाच वर्षे आहेत तर ताकतीन हा मुद्दा मांडला पाहिजे. आरक्षणाबाबत तुमच्या मनामध्ये काय आहे हे सांगितलं पाहिजे. शपथविधी सोहळ्याला कशामुळे विलंब झाला हे मला सांगता येणार नाही. तिसरी आघाडी चिंतन करूनच आता पुढे जाईल. बच्चू कडू यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा देखील पराभव झाला.
शपथविधी सोहळ्याला मी जाणार नाही, कारण..
सगळ्या गडकोट किल्ल्यांवर जे अतिक्रमण झाला आहे ते निघालं पाहिजे. कोणत्याही धर्माचं अतिक्रमण असेल तर ते काढलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांवर अतिक्रमण होता कामा नये. शपथविधी सोहळ्याला मला निमंत्रण आहे मात्र प्राधिकरणाच्या बैठकीमुळे मला जाता येणार नाही, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.