शरद पवार आज मारकडवाडी गावाला भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी इथे एका छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेनं केलेल्या भाषणातील मुद्दयांची सध्या चांगलीच चर्चा होतेय.
या महिलेनं महापुरूषांचा वारसा सांगत, भारताच्या इतिहासातील घटनेचा उल्लेख करत, सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आणि आक्रमक भाषण केलं. माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी या गावामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर बॅलेटवर मॉक पोल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने ही निवडणूक होऊ दिली नाही. त्यामुळे या गावात काही काळ संघर्ष निर्माण झाला होता. त्यावरुन आजच्या या सभेत या गावातल्या एका सामान्य महिलेनं शरद पवार यांच्यासमोर भाषण केलं.
मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे असं म्हणत मारकडवाडीच्या स्थानिक महिलेनं आक्रमक भाषण केलं. "EVM विरोधात जेव्हा आम्ही उठाव केला, तेव्हा आमच्यावर गुन्हा दाखल केला. असा काय गुन्हा आम्ही केला होता? नेमका काय प्रॉब्लेम झाला होता की इथे एवढे प्रशासनाचे लोक आले? असा परखड सवाल या महिलेनं सरकारला केला. इंग्रज भारतात आले तेव्हा भारतीयांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत होता, त्यानंतर गावोगावी आंदोलनं होत होते, तेव्हा लोकांना चिरडलं जात होतं. यावेळी 'बोस्टन टी पार्टी' घटनेचा उल्लेखही या महिलेनं केला. पुढे ही महिला म्हणाली की, "इंग्रजांना भारताबाहेर काढायला दीडशे वर्ष लागले, त्यामुळे आता EVM विरुद्ध जर उठाव करायचा असेल तर फक्त गावात उठाव करुन चालणार नाही, तर देशभर वनवा पेटला पाहिजे. आमच्या गावाचा नाद करायचा नाही असं म्हणत या महिलेनं सत्ताधाऱ्यांना इशाराही दिला.दरम्यान, मारकडवाडी या गावाचं नाव देशभर पोहोचलं आहे. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा लावून धरला आणि विधानसभा अधिवेशनात या मुद्दयाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेत या प्रकरणी निषेध नोंदवला होता. त्यानंतर आज शरद पवार, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आज या गावात उपस्थित राहून गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. तेव्हा गावकऱ्यांनीही या नेत्यांसमोर यंत्रणेबद्दलचा रोष व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.