लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. याच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बीकेसी येथे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. या सभांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी एका सभेला संबोधित करताना अदानी-अंबानी यांच्याबाबत विधान केले होते. याचाचा आधार घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी अदानी-अंबानी यांच्याबाबत केलेले विधान म्हणजे सेल्फ गोल होता. ही भ्रमित व्यक्तीची लक्षणे असून आपण आता जिंकत नाही, हातातून सत्ता निसटत चालली आहे, याची जाणीव झाल्याने मोदी व्यथित झाले आहेत, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. 400 पारचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला यंदाच्या निवडणुकीच फारफारतर 250 जागांवर विजय मिळेल, असे भाकितही पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले. निवडणुकीमध्ये हार-जीत होत असते. पंतप्रधान मोदी यांनीही पराभव स्वीकारला पाहिजे, असेही ते म्हणाले.
हिंदू-मुसलमान करेन त्या दिवशी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईल असे विधान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्याच दिवशी हिंदू-मुसलमान यावरच भाष्य केले. याचाही पृथ्वीराज चव्हाण यांनी समाचार घेतला. मोदींना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नसेल. महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्वांवर चालते आणि शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभावाचे सर्वात मोठे प्रतिक आहेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबईत झालेल्या मोदींच्या रोड शोचा देखील समाचार घेतला. घाटकोपर दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आणि तिथेच मोदींनी रोड शो केला. त्यांच्यात संवेदना असती तर त्यांनी रोड शोचा मार्ग बदलला असता. त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियाची भेट घ्यायला हवी होती, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 220-250 जागा मिळतील, तर एनडीएला बहुमताचा आकडाही पार करता येणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 2019च्या तुलनेत अनेक राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी होतील, असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.