सांगली लोकसभा मतदारसंघ… सांगली तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण यंदा इथं उमेदवारी कुणाला मिळणार? अन् विजय कुणाचा होणार याची जोरदार चर्चा रंगली. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या जागेवर दावा केला होता. काँग्रेसला ही जागा मिळाली तर विजय निश्चित असल्याचं विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी म्हटलं होतं. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली अन् ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. आपल्याला डावललं गेलं, अन्याय झाल्याची भावना विशाल पाटलांनी बोलून दाखवली. आता या सगळ्या प्रकरणात आता जयंत पाटलांचं नाव समोर आलं आहे.
जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांनी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशाल पाटील यांना सांगलीतून लोकसभेचं तिकीट न मिळण्याला जयंत पाटील जबाबदार असल्याचं म्हणण्यात आलं आहे. सांगलीचे काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील आहे. सांगलीच्या काँग्रेस आणि विशाल पाटलांच्या बाबतीत केलेली सगळी खेळी जयंत पाटलांची आहे. सगळ्या खेळी जयंत पाटलांनी संजय राऊतांच्या माध्यमातून केल्या, असा गंभीर आरोप जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा जयंत पाटलांवर केला आहे.
सांगली जिल्ह्यातून वसंतदादा घराणे संपवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घातलाय. जतमध्ये काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जाहीर बैठकीत विलासराव जगताप यांनी हा गंभीर आरोप केला आहे. विलासराव जगताप यांनी केलेल्या आरोपांना जयंत पाटील काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल.
सांगलीत तिरंगी लढत
विशाल पाटील यांना काँग्रेसमधून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली. त्यांच्या या निर्णयाने सांगलीच्या राजकारणात बदल झाला आहे. महायुतीचे उमेदावार संजयकाका पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात ही तिरंगी लढत होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.