निवडणुकांआधी EDचा वापर लोकशाहीविरोधी - रघुराम राजन
निवडणुकांआधी ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर अयोग्य आणि लोकशाहीविरोधी आहे. त्या मुद्द्यावर केवळ राजकारण्यांनीच नव्हे; तर प्रत्येकाने विचार करायला हवा, असे परखड भाष्य भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुरूवारी केले.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. त्या घटनेवर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या. अशात राजन यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ईडीविषयी मांडलेली भूमिका लक्षवेधी ठरली आहे. केवळ काही राजकारण्यांना तुरूंगात टाकले जात आहे असा विचार करणे चुकीचे ठरेल. विरोधी पक्षांच्या नेत्यांना गजाआड केले गेल्यास जनतेपुढे कुठला पर्याय उरेल? जनतेसमोर पर्याय नसेल तर तो केवळ राजकारण्यांचा मुद्दा राहत नाही, असे त्यांनी म्हटले.
मागील काही काळापासून अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. सोरेन यांच्या अटकेनंतर विरोधकांनी टीकेची धार आणखी तीव्र केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.