अजितदादांच्या मोठ्या हालचाली; जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात लवकरच........
वाळवा तालुका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वाळव्यावर विशेष लक्ष आहे. तालुक्यातील बहुतांशी पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत.
इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात लवकरच राजकीय भूकंप पहायला मिळेल, असे भाकित अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष केदार पाटलांनी केले. त्यामुळे आमदार जयंत पाटलांना कोण धक्का देणार, या चर्चेने जोर धरला आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तालुक्यातील अनेकजण उत्सुक आहेत. महिन्याभरातच तालुक्यातील पदाधिकारी निवड करणार आहोत. वाळवा तालुक्यातील दबलेल्या व पिचलेल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत कामाची संधी मिळणार आहे, याकडे पाटलांनी लक्ष वेधले.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी खेचून आणू. जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळात पोहचवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पक्षबांधणी करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वासही केदार पाटलांनी व्यक्त केला.आगामी सर्व निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सामोरे जाणार आहे. इस्लामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत कार्यालय लवकरच होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे वाळवा तालुकाध्यक्ष पाटील यांनी दिली. यावेळी दादासाहेब पाटील, जमीर मगदूम, सचिन वाडेकर, प्रमोद खुडे, राहुल परिट, मंगेश पाटील उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वाळवा तालुक्यावर वर्चस्व आहे. सहकारी, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मोठे जाळे निर्माण केले आहे. कार्यकर्त्यांवर जयंत पाटील यांची पकड चांगली आहे, मात्र अजितदादा गटाकडून वाळवा तालुक्यावर लक्ष केंद्रित करुन जयंतरावांना धक्का देण्याची तयारी अजितदादा गटाकडून सुरु असल्याचे दिसून येते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.