कधीतरी आपलीच बातमी होऊ नये यासाठी ; नंदू गुरव
आपणाला कधी काहीच होत नाही...आपण अगदी फिट आहोत..या गैरसमजात माणसं जगतात आणि एक दिवस गोत्यात येतात. आपणाला शारीरिक, मानसिक त्रास होतोय हे सांगायला पण आपला इगो आडवा येतो. केवळ फुकटच्या फुशारक्यामुळं आणि ओव्हर कॉन्फिडन्समुळं कधीतरी दुखणं जीवानिशी येत आणि मग धाबं दणाणतं. अनेक पत्रकार मित्र अनेक दुखण्यानी हैराण झाले आहेत. मजा अशी की, हे ते स्वतःच काबुल करत नाहीत.
कुणाच्या पाठीत दोष आहे. डोळे नीट नाहीत, धाप लागते आहे. वजन वाढलं आहे आणि पोट पण. डोक्यावरचं टेन्शन शरीरावर दिसायला लागलं आहे. ना सकाळी लवकर उठणं ना कसला व्यायाम. कधीही काहीही खायचं..ते धड पचत नाही. खाल्लेलं पचत नाही-त्यानं पोट -डोक्याचे प्रॉब्लेम-त्यानं निद्रानाश-त्यानं पित्ताचा भयंकर त्रास-चिडचिड-त्यानं बीपी-शुगर. हे सर्रास आहे. पण मस्ती अशी की मला काहीच होणार नाही. कधीतरी ही मस्ती जीवाला घोर लावणार हे नक्की.
आज पत्रकार दिन.
मागील वर्षी जे सांगितलं त्याचा काही उपयोग झाला नाही. मी स्वतःही काहीच मनावर घेतलं नाही. म्हणून हा दोस्तीचा फुकटचा सल्ला आज पुन्हा...
१. डोक्याला ताप करून घ्यायचा नाही. तुम्ही यायच्या अगोदर पण पेपर निघत होता आणि तुम्ही गचकाल त्यादिवशीही तो नेहमीसारखा निघणार आहे.२. पैसे पैसे करून बोंबलायची गरज नाही. पाच रुपये कमी मिळाले तर आपण रस्त्यावर येत नाही. कमिशन आणि यादीच्या नादात शुगर झाली तर कमावलेला पैसे दवाखान्यात जाईल.३. पायी चालायचं..तुमचं बिट जिथं असेल तिथं रोज चालत जाता येतंय का बघा. गाडी कशाला?४. कामाची वेळ ठरवून घ्या. उदाहरणार्थ..महापालिका-झेडपीला सहा वाजता कुलूप लावून पदाधिकारी आणि अधिकारी बायको-पोरांच्यात निवांत बसत असतील तर तुम्ही मध्यरात्रीपर्यंत बातम्या बडवत का बसलाय?६. सुट्टीदिवशी काम करायचं नाही.७. पेपर आणि बिट सोडून आपल्याला आपलं आयुष्य आहे हे लक्षात ठेवायच.७. महिन्यातून एकदा बायको-पोरांना घेऊन फिरून यायचंच. महिन्यातून दोनदा सिनेमा बघायचाच.८. दारू-सिगारेट-मावा-तंबाखू एका रात्रीत सुटणार नाही हे नक्की. पण कमी करायचं हेही नक्की. त्यासाठी दोस्त बदला.९. रोज पहाटे लवकर उठा. फिरायला जा. फोटो काढा. ग्रुपवर टाका. सात वाजता घरी या. रात्री जेऊ नका. हलकं काहीतरी खा आणि लवकर झोपा.१०. कुजक बोलायचं, मापात काढायचं, पाय ओढायच, दुसरा कवा मरेल त्याची वाट बघत बसायचं, हात-पाय घासायचं थांबवा...कारण, त्यानं कुणाला काहीही फरक पडत नाही. उलट तुमचं आयुष्य कमी होत....११. बाकी आणखी काही चांगलं सुचलं तर कराच. आयुष्यमान भव :
🌱 नंदू गुरव.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.