दडपशाही करून भाजपने पक्ष फोडला, घरेही फोडली; सुप्रिया सुळेंचा घणाघात
जालना : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली आहे. दडपशाही करून भाजपाने पक्ष फोडला आणि घरे देखिली फोडली आहे. मात्र, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. अदृश्य शक्तीच्या बळावर संविधानाला बाजूला ठेवून निर्णय घेतले जात असून, हे दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तर, शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला होता. मात्र, काल लागलेल्या निकालाची ऑर्डर इंग्रजीत वाचली. ऑर्डर दुसऱ्याने लिहिली, यांना वाचायला दिली,अशी दबक्या आवाजात चर्चा असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा, धनगर, लिंगायत समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणाची मागणी सातत्याने केली जात आहे. आताच्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता स्थापन करण्यापूर्वी छातीठोकपणे आरक्षण देण्याची भाषा केली होती. आज दहा वर्षे लोटली, कुणाला दिले आरक्षण? असा असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे...
राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात दुष्काळी परिस्थिती असून, पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून पाणीप्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. दुष्काळी परिस्थितीबाबत आपण अगोदरच केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. याशिवाय विकासाच्या प्रत्येक मुद्यावर आपण संसदेत नेहमीच आवाज उठवित आलो आहोत असेही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात भेट
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात देखील भेट दिली. तर, रुग्णालयात घुसून एका टोळक्याने निवासी डॉक्टरांना रॉडने मारहाण केल्याची घटना समोर आली होती आणि याच जखमी डॉक्टर महिलेची सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. तसेच "ही अतिशय गंभीर बाब आहे. रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स देखील सुरक्षित नसतील तर रुग्णसेवा सक्षम कशी राहिल?, मूळात या राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री नाही. त्यामुळे हे प्रकार घडत असून, कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच, छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना गेल्या काही महिन्यांपासून स्टाइपेन्ड मिळालेला नाही. या डॉक्टरांना यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी याबाबत तातडीने वैयक्तिक लक्ष घालून या डॉक्टरांना स्टाइपेन्ड देण्याबाबतची कार्यवाही करावी ही विनंती," असल्याच्या सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.