ईव्हीएम असेपर्यंत भाजपला सत्तेतून हटवता येणार नाही - सत्यपाल मलिक
नवी दिल्ली: परखड भूमिका मांडण्यासाठी ओळखले जाणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शुक्रवारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविषयी (ईव्हीएम) साशंकता व्यक्त केली. सध्याच्या स्वरूपातील ईव्हीएम असेपर्यंत भाजपला सत्तेतून हटवता येणार नाही, असे भाष्य त्यांनी केले.
जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी त्यांच्या यूट्युबवरील दिल से या कार्यक्रमात मलिक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मलिक यांनी ईव्हीएमविषयी त्यांची भूमिका मांडली. विरोधकांनी निवडणुकांत ईव्हीएमचा वापर हा मोठा मुद्दा बनवावा. दबावात असल्याने निवडणूक आयोग त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ईव्हीएमशी छेडछाड कशी काय केली जाऊ शकते असा प्रश्न निवडणूक आयोग साशंकता व्यक्त करणाऱ्यांनाच विचारत असल्याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधले. त्यावर मलिक म्हणाले, अनेकांनी तसे केले आहे. तसे करताना मी एका व्यक्तीला पाहिले आहे.
निवडणूक आयोगाची भूमिका अयोग्य आहे. साशंकता असेल तर मतपत्रिकांचा वापर का केला जात नाही, अशी विचारणाही त्यांनी केली. मतदानानंतर व्हीव्हीपॅट पावत्या मतदारांकडे सोपवल्या जाव्यात. त्या पावत्या मतदार मतपेट्यांमध्ये टाकतील. नंतर त्यांची मोजणी होईल, याविषयी संवादावेळी मलिक आणि सिब्बल यांच्यात सहमती झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.