सदाभाऊ खोतांचा भाजपला सवाल; आम्ही काय बँडवाले आहोत का?
सांगली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेतले जात आहेत. आज सांगली जिल्ह्यात मेळावा पार पडला. यावेळी सभेमध्ये बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आपली व्यथा सांगितली. निवडणुका आल्या म्हणून आता आम्हाला बोलावलं जातंय, असं ते सभेमध्ये म्हणाले.
आम्हाला काही द्या नका द्या पण आम्ही तुमच्यासोबत आहोत. मुंबईच्या बैठकीमध्ये मी गेलो होतो. नेते म्हणाले आता कामाला लागा, योजना लोकांपर्यंत पोहोचवा. मी म्हणालो तुम्ही आम्हाला काय समजलंय. आम्हाला काय बँडवाले समजलंय का? लग्न ठरायला आलंय म्हणून ताशे-पिपाणी, ढोल पाहायला लागलाय. आम्हाला फक्त वाजवायला बोलावताय का? नेमकं आम्हाला बोलावलंय का? असा संतप्त सवाल त्यांनी भाजप नेत्यांना केला.
घटक पक्षाला एक सदस्यपद देऊ शकत नाही. आणि मग म्हणायचं आमची महायुती. म्हणजे नेमकी कोणाची युती आहे. त्यामुळे मला स्पष्ट सांगायचंय आमचा अपमान करु नका. आम्ही लढणारे नेते आहोत. पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आम्ही लढायला तयार आहोत, असं खोत म्हणाले. घटक पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर बैठकीला बोलावले आहे. शेवटी का होईना आमची आठवण झाली, असं म्हणत त्यांनी चिमटा काढला.
आम्ही चळवळीतले नेते आहोत. शेवटी निवडणुकीच्या शेवटी का होईना आमची आठवण आली. सत्तेच्या काळात घटक पक्षांना उचित सन्मान दिला नाही. निधीपण दिला नाही. सर्व घटक पक्षांना तुम्ही बोलवायला हवं होतं. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही खुरपी घेऊन आलोय. तण काढतोय. पण, आमची उपेक्षा करु नका, अशी विनंती त्यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.