आयुष्यमान कार्ड कोणाला काढता येतं? तुम्ही पात्र आहात की नाही असं चेक करा
गरीब नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. आयुष्मान योजनेअंतर्गत, आयुष्मान कार्डधारकांना निवडक रूग्णालयांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात. या योजनेचं नाव बदलून ‘आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना’ असं करण्यात आलं आहे. सध्या देशभरात पात्र नागरिकांचं आयुष्मान कार्ड तयार केलं जात आहे. या योजनेसाठी कोण पात्र असेल आणि हे कार्ड कसं काढलं जातं? याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.
आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही? हे जाणून घेण्यासाठी योजनेच्या pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. तिथे तुम्हाला ‘अॅम आय एलिजिबल’ असा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकावा लागेल. तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर दोन पर्याय उपलब्ध होतील. पहिल्या पर्यायात तुम्हाला तुमचं राज्य निवडावं लागेल तर दुसऱ्या पर्यायात मोबाईल क्रमांक किंवा रेशन कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
आवश्यक ते तपशील टाकून सर्च केल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे समजेल. जर तुम्ही पात्र असाल तर जवळच्या नागरीसेवा केंद्रात जाऊन तुम्ही आयुष्मान कार्ड तयार करून घेऊ शकता. या शिवाय तुम्ही, 14555 या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही तुमची पात्रता तपासू शकता. आयुष्मान भारत योजनेचं कार्ड तयार करून घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, एक वैध फोन नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणं गरजेचं आहे.
या योजनेतील लाभार्थी देशभरातील सरकारी आणि निवडत खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना कोणतीही आगाऊ रक्कम किंवा कोणत्याही कागदपत्रांशिवाय उपचारांचा लाभ घेता येईल. हे कार्ड सहजपणे घेऊन फिरता येतं आणि ते संपूर्ण भारतात वापरलं जाऊ शकतं. विशेष म्हणजे आयुष्मान भारत कार्ड बनवण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.