मुनव्वर राणा यांचं निधन, वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुनव्वर राणा प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून लखनऊ येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मुन्नावर राणा यांची मुलगी सुमैया राणा यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं की, "रविवारी रात्री उशिरा तिच्या वडिलांचं रुग्णालयात निधन झालं आणि सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील."
त्यांचा मुलगा तबरेझ राणा यांनी पीटीआयला सांगितले की, "आजारपणामुळे मुनव्वर राणा यांना14 ते 15 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना प्रथम लखनौमधील मेदांता आणि नंतर एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांनी रविवारी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला."राणा हे त्यांच्या कवितांसाठी, शायरीसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या आईवर लिहिलेल्या कविता खूप गाजल्या आहेत. 'शाहदाबा' या काव्यसंग्रहासाठी राणा यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. मुनव्वर राणा यांना 2014 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
पुरस्कार परत केला
2015 मध्ये उत्तर प्रदेशच्या दादरी येथे अखलाकच्या लिंचिंगच्या घटनेनंतर, राणा यांनी एका वृत्तवाहिनीवरील थेट चर्चेदरम्यान त्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. देशातील वाढती असहिष्णुता हे त्यांनी या निर्णयामागचे कारण सांगितलं होतं.
ते म्हणाले होते की, "लोकांना वाटतं की एकतर मुनव्वर राणा घाबरला आहे किंवा त्यानं स्वत:ला विकलं आहे. मला जर विकायचं असतं तर मी चाळीस वर्षांपूर्वी विकला गेलो असतो. आता माझी काळजी कोणाला आहे? माझ्यासाठी हा पुरस्कार माझ्यासाठी एक ओझं बनला होता. फक्त ते ओझं दूर झालंय."
पुढे ते म्हणाले होते, "हा सरकारचा निषेध नाही, समाजाचा निषेध आहे. पण सरकार समाजाची काळजी घेत असतं. जर शंभर लोकांनी ठरवलं असेल की, एखाद्याच्या घरात गाय किंवा म्हशीचे मांस आहे किंवा त्यानं लव्ह जिहाद केला आहे, तर याचा अर्थ असा की सरकार किंवा पोलिसांची कोणतीही भूमिका नाही."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.