दोनशेच्या पेपरात 214 मार्क मिळत असतील, तर सातबाऱ्यांवर कोणाचे नाव दाखवेल याचा अंदाज न केलेला बरा; राजू शेट्टींची
तलाठी परीक्षेत 200 पैकी 214 मार्क पडल्याने भावी तलाठ्यांसह ज्येष्ठ तलाठ्यांपर्यंत डोकं खाजवण्याची वेळ आली आहे. निकालामध्ये झालेल्या गोंधळानंतर सरकारकडून थातूरमातूर उत्तर देऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला, तरी राज्यातील विरोधी पक्षांसह विद्यार्थ्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज तलाठी परीक्षेतील गोंधळावरून खोचक शब्दात टीका केली आहे.
राज्यकर्त्यांनो महाराष्ट्र विकू नका गोरगरीब पोरांसाठी काहीतरी शिल्लक ठेवा. 200 मार्काचा पेपर सोडवून जर तलाठी भरतीत मुलांना 214 मिळत असतील तर ज्यांनी 214 मार्क पाडले आहेत तो शेतकऱ्यांचा सात बाऱ्यावर कोणाचे नाव व कोणाचे क्षेत्र दाखवेल याचा अंदाजच न काढलेला बरा, अशी टीका त्यांनी केली आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून सांगतोय सरळसेवा भरतीत घोटाळे होत आहेत. MPSC मार्फतच सर्व भरती प्रक्रिया झाल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
राजू शेट्टींनी घेतली अजित पवारांची भेट
दरम्यान, सरळसेवा पध्दतीने तलाठी भरती प्रक्रियाच्या परिक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले आहे. परिक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना 200 मार्काच्या पेपरला 214 मार्क पडले असल्याचे प्रकार समोर आल्याने परीक्षा कशा पारदर्शक पध्दतीने झाल्या असतील हे दिसून येते. यामुळे सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घ्याव्या अशी मागणी राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून सरळसेवा भरती प्रक्रियांमध्ये ज्या कंपन्यामार्फत पेपर घेतले जातात ते घोटाळा करतात हे बऱ्याचवेळा सिध्द झालं आहे. यामुळे अनेकदा सरकारवर नामुष्की येवून शासनास परिक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आतासुध्दा तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार, होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे असे जर सरकारचे म्हणणं असेल तर या निकालपत्रातील 200 पैकी 125 पेक्षा जादा गुण ज्या विद्यार्थ्यांना पडले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांची एमपीएससी परिक्षा घेऊन पात्रता सिध्द करण्यास संधी द्यावी. जर यामध्ये हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उतीर्ण झाले तर विद्यार्थ्यांचा सरळसेवा भरती प्रक्रियेवर व शासनावर विश्वास बसेल, असे निवेदनात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.