साधूंना मारहाण प्रकरणी 12 जणांना अटक
कोलकाता: अपहरणकर्ते समजून तीन साधूंना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील तीन साधू गंगासागर मेळ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये जात होते. यावेळी ते अपहरण करण्यासाठी आलेत अशा संशयाने त्यांना स्थानिकांनी मारहाण केली होती. यावरुन राजकारण तापू लागलं आहे.
पश्चिम बंगालच्या पुरुलीया जिल्ह्यामध्ये साधूंना मारहाण झाली होती. या मुद्द्यावरुन राजकारण तापवलं जात आहे. भाजपने यावरुन तृणमूल काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. साधू आणि त्याचे दोन मुलं एका खासगी वाहनातून मकर संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी गंगासागार यात्रेला निघाले होते.
माहितीनुसार, या साधूंनी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तीन मुलींना रस्ता विचारला. यावेळी भाषेच्या वेगळेपणामुळे महिलांना गैरसमज झाला. त्यामुळे तीन मुली ओरडल्या आणि पळायला लागल्या. याची दखल तेथे उपस्थित स्थानिकांनी घेतली. त्यांनी साधूंची गाडी अडवली. त्यांना गाडीबाहेर काढून मारहाण केली.
व्हिडिओमध्ये दिसतंय की, जमाव गाडीची नासधूस करत आहे. प्रकरण चिघळल्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती केली आणि साधूंना कासीपूर पोलीस स्टेशनला नेले. पोलीस अधीक्षक अभिजित बॅनर्जी यांनी सांगितलं की, तक्रार दाखल करुन घेण्यात आली असून तपास सुरु करण्यात आलाय. साधूंना मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरावर छापा देखील टाकण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितलं की, साधूंचा रस्ता चुकला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मुलींना मार्ग विचारला. मुली घाबरल्या आणि पळू लागल्या. मुलींचे अपहरण करण्यासाठी ते आलेत या शंकेतून स्थानिकांनी साधूंना मारहाण केली. सदर घटनेनंतर साधूंना गंगासागर यात्रेला जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा करुण देण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.