Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1256 पदांसाठी वनरक्षक भरती, तुमचे वनरक्षक होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

1256 पदांसाठी वनरक्षक भरती, तुमचे वनरक्षक होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

मुंबई: महाराष्ट्र शासनाकडून वनरक्षक पदांची 1256 पदे भरली जाणार आहेत. लवकरच ही भरती  प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. सदर भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देखील देण्यात आले. ही भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून खोळंबली होती. मात्र, आता यामधून मार्ग काढत उमेदवारांना मोठा दिलासा हा देण्यात आला आहे.

राज्य शासनाने एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टिसीएस आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया रखडली होती.

त्यामुळे भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. शेवटी यामधून मार्ग निघाला असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित 1256 वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे चार लाख उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत एकूण तीन लाख 95 हजार 768 परिक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली होती त्यातील एकूण दोन लाख 71 हजार 838 परीक्षार्थी 45 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या पुढील भरती प्रक्रियेत टीसीएस आयओएन कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील. ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल.


अशी होणार निवड :

ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे मार्क एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवडसूचीतील उमेदवारांची 25 कि.मी. आणि 16 कि.मी. चालण्याची चाचणी घेण्यात येईल. या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया 17 जानेवारी पासून सुरू करण्यात येत असून वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार 15 दिवस ते 44 दिवस या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.