धक्कादायक ! लहान मुलांनी खेळताना कुत्र्याच्या पिलांनाच जिवंत जाळलं; चार पिलांचा भाजून मृत्यू
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये तीन मुलांनी खेळताना कुत्र्याच्या घराला आग लावली. या आगीत चार पिल्ले जिवंत जळाली. चार पिलांच्या मृत्यूने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून लोकांना शांत केले. पोलिस एका मुलाला घेऊन पोलिस ठाण्यात आले. त्याचवेळी मोकाट जनावरांसाठी काम करणाऱ्या उमेद एक किरण या सामाजिक संस्थेने किडवई नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
किदवाई नगर पोलिस स्टेशन हद्दीतील गीता पार्कमध्ये एका मादी श्वानाने 4 मुलांना जन्म दिला होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्थानिक लोकांनी गवत आणि गोण्यांच्या मदतीने या श्वानांसाठी घर बांधले. परंतु, बेगमपुरवा येथे राहणाऱ्या 8 ते 12 वर्षे वयोगटातील तीन मुलांनी खेळताना घराला आग लावली. यामुळे पिलांचा मृत्यू झाला. मुलांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिक लोकांनी मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान, एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, यासंदर्भात तक्रार आली आहे. घटनेचा तपास करण्यात येत आहे. तपासात जे काही तथ्य समोर येईल, त्याआधारे कारवाई केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.