एलसीबीतील तिघांचे निलंबन महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचनेनंतरची पहिली कारवाई
कोल्हापूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तीन पोलिसांना निलंबित केले. नुकतेच कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी एलसीबी, डीबीतील निष्क्रीय लोकांना हटवण्याच्या सूचना पाच जिल्ह्यातील अधिक्षकाना दिल्या आहेत. त्यानंतर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. सोमवारी रात्री हा आदेश काढण्यात आला. सहायक फौजदार संभाजी कृष्णात भोसले, पोलिस हवालदार पांडुरंग तुकाराम पाटील आणि कॉन्स्टेबल संदीप ज्ञानदेव गायकवाड अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक पंडित यांनी सर्वच शाखा आणि पोलिस ठाण्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, काही पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अखेर कारवाईला सुरुवात झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अधीक्षक पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तिघांना निलंबित केले. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे है वैयक्तिक कारणास्तव रजेवर गेल्याने त्यांचा तात्पुरता कार्यभार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.