महाविकास आघाडीतून शरद पवारांना बाहेर काढण्याचा काँग्रेसचा प्लॅन - प्रकाश आंबेडकर
आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीतून शरद पवारांना बाहेर काढण्याचा प्लॅन काँग्रेस करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आमचा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा समझोता झाला आहे का? तर तो झाला आहे. मात्र, जागा वाटपाबद्दल आमच्यात काही चर्चा झालेली नाही.
कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यासाठी किती जागा सोडेल? हे अजून त्यांनाच माहीत नाही. मला अद्याप शिवसेना ठाकरे गटाने कन्फर्म काहीच सांगितलेलं नाही. आम्हाला मिनिमम 30 जागा पाहिजे, असं काँग्रेसने सांगितलं आहे. तर 18 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहे. याची बेरीज केली तर त्यांच्या 48 जागा होतात. याच्यातून आम्हाला काँग्रेसचा गेम प्लॅन दिसत आहे.
काहीही न बोलता काँग्रेसला शरद पवारांना महाविकास आघाडीतून बाहेर काढायचं आहे. तुमच्याकडे काहीच राहिलेले नाही, असं सांगून काँग्रेस राष्ट्रवादीला बाहेर काढू शकते. सध्या आमचा एकच पक्ष आहे जो फुटलेला नाही, असं काँग्रेसवाले म्हणतात.”
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभा निवडणुकानंतर देशाचे पंतप्रधान राहणार नाही आणि हे निश्चित आहे. भविष्यात कुणाचं सरकार येईल? हे आज सांगता येणार नाही. मात्र, येणाऱ्या काळात देशात मोदींचं सरकार येणार नाही”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.