मोदी विदेशात मित्रांसाठी डील करतात; प्रियांका गांधी यांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यांवर जाऊन त्यांच्या उद्योजक मित्रांसाठी डील करतात, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील निवाई येथील काँग्रेसच्या सभेत केला.
विदेशातून परतल्यावर मोदी हिंदुस्थानबद्दल परदेशात आदर वाढला असल्याचे सांगतात. नंतर आपल्याला कळते की त्यांनी त्यांच्या उद्योजक मित्रांसाठी तिकडे काही करार केले आहेत. जनहितापेक्षाही मोदी त्यांच्या उद्योजक मित्रांच्या हिताला प्राधान्य देत असल्याचेही त्या म्हणाल्या. केंद्र सरकारची सर्व धोरणे धनाढय़ांची धन करणारी असून यांच्याकडे गरीबांसाठी काहीही नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केली. भाजपने देशातील गोरगरीबांकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
देव काय सांगतोय ते ऐका…
जी 20 साठी उभारलेला भव्य मंडप जलमय झाल्याचा उल्लेख करत प्रियंका यांनी मोदी यांना, देव काय सांगतोय ते ऐका.. असा टोला लगावला. कदाचित लोक जे भीतीमुळे सांगू शकत नाहीत ते देवाने सांगितलं असावं.. तुमचा अहंभाव कमी करा, या देशाने तुम्हाला नेता बनवलं आहे त्या देशाला प्राधान्य द्या, जनतेला सर्वोच्च स्थान द्या, असे त्या म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.