राज्यघटनेच्या प्रतीमधून 'समाजवादी','धर्मनिरपेक्ष' शब्द वगळले" ; काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल
केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी संसदेत महिला आरक्षण विधेयक अर्थात 'नारी शक्ती वंदन' कायद्यावरही चर्चा होणार आहे. मात्र त्याअगोदरच देशात नव्या वादाला तोंड फुटले असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी नव्या संसदेत त्यांना मिळालेल्या संविधानाच्या प्रतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. या संविधानात ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
नव्या संसद भवनातील संविधानाच्या प्रतीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. यावेळी बोलताना अधीर राजन चौधरी यांनी,"आज आम्हाला संविधानाच्या नवीन प्रती देण्यात आल्या होत्या, त्या आम्ही हातात धरून (नवीन संसद भवनात) प्रवेश केला. त्याच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी, धर्मनिरपेक्ष’ असे शब्द नाही. 1976 मध्ये दुरुस्ती करून हे शब्द जोडण्यात आले हे आपल्याला माहीत आहे, पण आज जर कोणी आपल्याला संविधान देत असेल आणि हे शब्द तिथे नसतील तर ही चिंतेची बाब आहे,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
त्यासोबतच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारच्या उद्देशावर संशय व्यक्त करत म्हणाले,"त्याचा हेतू संशयास्पद आहे. हे अत्यंत हुशारीने केले आहे. ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. मी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला पण मला हा मुद्दा मांडण्याची संधी मिळाली नाही." असेही त्यांनी यावेळी म्हटले.
काल नवीन संसदेत काय झाले?
काल नवीन संसद भवनात लोकसभेचे कामकाज महिला आरक्षण विधेयकाने सुरू झाले. हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे विधेयक आता ‘नारी शक्ती वंदन कायदा’ म्हणून ओळखले जाईल. यानंतर विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी बोलायला उठले असता ते म्हणाले की, हे विधेयक काँग्रेस सरकारच्या काळात मांडण्यात आले होते आणि ते राज्यसभेत अडकले असताना लोकसभेत मंजूर झाले आहे.
त्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, सभागृहातील प्रत्येक व्यक्तीचे काय विचार आहेत हे त्यांच्या वर्तनावरून कळेल. फक्त या लोकांकडे पहा. ते तुमच्या शब्दालाही मान देत नाहीत. अशा प्रकारचे वागणे म्हणजे थेट पंतप्रधानांचा अपमान आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.