बावनकुळेंची लायकी आहे का उद्धव ठाकरेंवर टीका करायची? - संजय राऊत
नवी दिल्ली: आज (27 जुलै) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. त्यांच्या या मुलाखतीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करायला चंद्रशेखर बावनकुळे यांची लायकी आहे का? असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर देत संजय राऊत म्हणाले, “कोण बावनकुळे? त्यांची लायकी आहे का उद्धव ठाकरेंवर टीका करायची?
बावनकुळे आयत्या बिळात रेघोट्या मारत टीका करत आहे. त्यांनी आधी स्वतःचा पक्ष काढावा. मग मी त्यांचा सत्कार करेल.” यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, “आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे.
त्यांना त्यानिमित्तानं खूप खूप शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळं त्यांचे चाहते, त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे ठाकरेंनी यावर्षी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं म्हटलं आहे.”
संजय राऊत यांनी यावेळी बोलत असताना संसदेच्या अधिवेशनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. “संसद चालू नये ही सरकारची एक योजना आहे. मणिपूरनंतर आता मिझोरामचे लोक रस्त्यावर उतरले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर बोलायला तयार नाही. मोदींनी आधी माणिपूरवर बोलायला हवं, आम्हा विरोधकांची ही भूमिका आहे”, असही ते यावेळी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.