अजित पवार यांची डील मुख्यमंत्रिपदासाठीच! संजय राऊत यांचा दावा
नवी दिल्ली : अजित पवार यांनी भाजपसोबत मुख्यमंत्रिपदासाठीच डील केली आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं जाणार आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत हे सध्या दिल्लीत आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
बुलढाण्यात बसचा मोठा अपघात झाला. लोकांचे जीव गेले. त्यांच्या चितेचा जाळ संपलेला नसताना हे लोक शपथविधी करत होते. प्रेतं पडलेली आहेत. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे आणि हे सत्ताधारी लोक इकडे राजभवनात हे लोक पेढे वाटत होते. एकमेकांना मिठ्या मारत होते. या सगळ्यांना याची किंमत चुकवावी लागणार आहे, असं संजय राऊत म्हणालेत. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. त्यां मृतांच्या चिता जळत असताना ज्या घाईत राजभवनावर शपथविधी जल्लोषात साजरा झाला हे निर्दयी आहे, असंही ते म्हणाले.
आज गुरुपौर्णिमा आहे, आमचे गुरू बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. काल गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी गुरूला दगा देण्यात आला आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून, समाजकारणातून, इतिहासातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांचा इतिहास पुसण्यासाठी हे घाणेरडं राजकारण सुरू आहे. हा खेळ सुरू आहे. पण हा असला खेळ लोकशाही आणि देशाला परवडणारा नाही, असंही राऊत म्हणालेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.