शालेय विद्यार्थी व नागरिकांमध्ये ट्रॉफिक सेन्स निर्माण होणे गरजेचे- पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली
सांगली, दि. 27, : रस्त्यावरील वाढत्या अपघातांची संख्या ही चिंतेची बाब आहे. रस्ता सुरक्षेबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये ट्रॉफिक सेन्स निर्माण होणे काळाची गरज आहे. यासाठी शालेय स्तरावरच जनजागृतीचे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी व्यक्त केले. कृष्णा मॅरेज हॉल येथे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली आरएसपी सत्र शुभारंभ बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा समादेशक अनिल शेजाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, जिल्हा वाहतूक नियंत्रण प्रमुख मुकुंद कुलकर्णी यांच्यासह आरएसपी व जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली म्हणाले, शाळांमधून विद्यार्थ्यांना आरएसपी चे धडे मिळाल्यास सुरक्षित वाहतूकीबाबत बाल वयातच संस्कार होतील. या उपक्रमासाठी पोलीस विभागामार्फत आवश्यक सहकार्य केले जाईल. रस्ता सुरक्षेमध्ये वाहतूक सुरक्षा दलाचे मोलाचे योगदान असून आरएसपी नोंदणी शाळेत पोलीस दलामार्फत ड्रील इंस्ट्रक्टर देण्यात येईल. रस्ता सुरक्षा व जनजागृतीसाठी आरएसपीच्या विद्यार्थ्यामार्फत शहरातील महत्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीच्या नियमांची माहिती नागरिकांना करून दिल्यास त्याचा जनजागृतीसाठी अधिक लाभ होईल.जिल्हा समादेशक अनिल शेजाळे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात सांगितले, आजच्या गतीमान विज्ञान युगात सर्व क्षेत्रातील प्रगतीमुळे अधिक गतीमान धावणारी वाहने आली आहेत. यासाठी ट्राफीक सेन्स असेल तर अपघातावर नियंत्रण करणे शक्य होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भोसले यांनी केले. आभार डॉ. मुल्ला माजीद यांनी मानले. या कार्यक्रमास आरएसपीचे तालुका व शहर समादेशक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.