मणिपूरमधील जनतेचा आक्रोश ह्रदयद्रावक; राहुल गांधी
गेल्या 58 दिवसांपासून मणिपुरात हिंसाचाराचा आगडोंब सुरू आहे. हजारो नागरिक निर्वासित झाले असून, मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या छावण्यांना भेट देऊन हिंसाचार पीडितांना धिर दिला . यावेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला . ' मणिपूरमधील जनतेचा आक्रोश अत्यंत वेदनादायी , हृदयद्रावक आहे . येथील जनता मदतीसाठी अक्षरशः रडत आहे ,' अशा भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्या .
3 मे पासून मणिपूर जळत आहे. कुकी आणि मैतेई समुदायात आरक्षणाच्या मुद्दय़ावरून पेटलेला हिंसाचार दोन महिने होत आले तरी थांबलेला नाही. हिंसाचारात आतापर्यंत 125 वर लोकांचा मृत्यू झाला. शेकडो घरांची आगीत राखरांगोळी झाली. 65 हजारांवर नागरिकांना मदत छावणीत आश्रय घ्यावा लागला आहे.मणिपूरमधील मदत छावण्यांमध्ये गेलो आणि प्रत्येक समाजातील लोकांना भेटलो. छावण्यांमध्ये औषधांचा आणि अन्नधान्याचा तुटवडा असून, सरकारने याकडे लक्ष द्यावे. मणिपुरच्या सर्व जनतेला शांततेचे आवाहन करतो. मणिपुरला शांतता हवी आहे. शांततेसाठी मी प्रयत्न करेन.
राहुल गांधी अनेकांना रडू कोसळले
राहुल गांधी यांनी आज चुराचंदपूर आणि बिष्णूपूर जिल्हय़ातील मोइरांग शहरातील मदत छावण्यांना भेट दिली. आपली व्यथा जाणून घेण्यासाठी कोणीतरी भेटायला आलेले पाहून अनेक हिंसाचार पिडितांच्या आश्रुंचा बांध फुटला. छावणीतील वृद्ध महिला, मुली, लहान मुलांना रडू कोसळले राहुल गांधींनी धीर दिला. लहान मुलांबरोबर जेवण घेतले. मदत छावण्यांमधील नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर राहुल गांधींनी राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेऊन चर्चा केली.
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचे राजीनामा पत्र फाडले
मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात भाजपचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बिरेन सिंह राजीनामा देणार अशी चर्चा दिवसभर होती. त्यांनी राज्यपालांची वेळही मागितली. दुपारी 2.20 वाजता मुख्यमंत्री बिरेन सिंह आपल्या 20 मंत्र्यांसह राजीनामा पत्र घेऊन जाणार होते. मात्र, त्यांच्या निवासस्थानाबाहेर महिलांनी मोठी गर्दी केली. राजीनामा देऊ नका अशी मागणी महिला करत होत्या. मंत्री सुसींद्रु मैतेई हे राजीनामापत्र जमावापुढे वाचत होते. तेवढय़ात एका महिलेने हे पत्र फाडून टाकले. फाडलेले राजीनामा पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. दरम्यान, राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्याचे बिरेन सिंह यांनी जाहीर केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.