शरद पवार : मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार
छत्रपती संभाजीनगर, 7 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कालपासून छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शहराच्या नावाला मला संभाजीनगर म्हणायचं नाही तर औरंगाबादचं म्हणायचं आहे, असं विधान केले आहे. पवारांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा विषय खूप वर्षांपासून गाजत होता. महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या काळात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांचं नामांतर केलं. नंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने तो आदेश रद्द करुन नव्याने आदेश काढला.
मात्र, शरद पवारांच्या या विधानाचे काय पडसाद पडतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. काय म्हणाले शरद पवार? शहराच्या नावाला मला संभाजीनगर म्हणायचं नाही तर औरंगाबादचं म्हणायचं, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी नगर येथील सौहार्द या कार्यक्रमात उपस्थीत असताना पवार बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या प्रवासा संदर्भात काढलेल्या आठवणीत त्यांनी हे विधान केले आहे.
दंगलीवर पवारांची प्रतिक्रिया नगरला काही तरी झालं. कोल्हापूरला काही झालं. कुणी तरी मोबाईलवर मेसेज पाठवला. चुकीचा असेल, नाही असे नाही. पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही. सत्ताधारी वर्ग अशा गोष्टीला प्रोत्साहित करतो. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पण राज्यकर्तेच रस्त्यावर उतरायला लागले, त्यांचे सहकारी उतरायला लागले तर दोन समाजात जातीय कटुता निर्माण होत आहे.
ते योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले.
ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले झाले. चर्च आणि ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय असतो. काही तक्रार असेल तर पोलिसांना सांगितली पाहिजे. पण म्हणून चर्चेवर हल्ला करण्याची गरज काय आहे? या मागे एक विचारधारा आहे. ती विचारधारा सामाजाच्या हिताची नाही, असा आरोप त्यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.