Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वसंतदादा च्या तिसर्‍या पिढीला विश्वजीत कदम यांचे नेतृत्व पचनी पडणार का ?

वसंतदादा च्या तिसर्‍या पिढीला विश्वजीत कदम यांचे नेतृत्व पचनी पडणार का ?


सागंली : काँग्रेसच काँग्रेसला पराभूत करू शकते, आमच्या वैयक्तिक महत्वकांक्षामुळे काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले असून यापुढे माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असल्याची ग्वाही वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांनी रविवारी सांगलीत झालेल्या महानिर्धार मेळाव्यात दिली.

आता जाहीर सभेत बोललेलच सगळं खरच मानायचं म्हटले तर मागच्या चुकांचे खापर कोणावर फोडणार? एकेकाळी राज्याचे नेतृत्व असलेल्या वसंतदादा पाटलांच्या घराण्याला कदमांचे नेतृत्व पचनी पडणार का हा खरा प्रश्‍न आहे. कारण व्यासपीठावर बोललं की पाळावच लागतं का या प्रश्‍नाचे उत्तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील अधिक चांगल्या पध्दतीने देऊ शकतात.

वसंतदादा घराण्यातील तिसरी पिढी आज राजकारणात आहे. वसंतदादांनी स्थापन केलेला आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे जिल्हा बँकेने ताब्यात घेउन भाडेकराराने चालविण्यास दिला. वसंतदादा शेतकरी बँक अवसायानात निघाली, वसंतदादा बाजारचे नावच आताची पिढी विसरली आहे. याउलट कदम गटांने सोनहिरा साखर कारखाना चालवत असताना उदगिरी कारखान्याची उभारणी केली. जत तालुक्यात दोन कारखाने उभे केले. मग दादा घराण्यातील वारसदारांनी गेल्या तीन दशकात काय केले ? असा प्रश्‍न सहाजिकच येतो. 

केवळ कारखान्याच्या गेस्ट हाउसवर बसून जिल्ह्याच्या राजकारणात ढवळाढवळ करण्यापलिकडे विकासाचे काम काय केले याचे उत्तर वारसदारांनी द्यायला हवे. केवळ आजही दादांच्यावर असलेल्या श्रध्देपोटी लोक बोलत नाहीत, उद्याच्या पिढीने हे सगळे विसरून जाईल त्यावेळी वारसा नव्हे कर्तत्व काय असा सवाल केला तर काय उत्तर देणार? हाच सवाल कदम गटालाही लागू पडतो. केवळ वारसा सांगून लोक ऐकतील आणि माना डोलावतील अशी आज स्थिती नाही. सगळा आज रोख, उद्या उधार असाच जमाना आहे. सांगलीत झालेल्या महानिर्धार मेळाव्याच्या निमित्ताने काँग्रेसने आत्मपरिक्षण करण्याचे योजले आहे हे एका दृष्टीने बरे झाले. चुका टाळण्याअगोदर कबुली देण्यातही मोठेपणा असतो. ही कबुली विशाल पाटलांनी दिली याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. 

मात्र, मनाने सर्वच काँग्रेसजन एकत्र येतील का? काँग्रेसमध्येही गटबाजी आहे. एकीकडे गटबाजी जिवंत पणाचे लक्षण मानायचे म्हटले तर काँग्रेसचा वृक्षच आज पर्णहिन होण्याच्या स्थितीत पोहचला आहे. राज्याचे नेतृत्व करणार्‍या दादा घराण्याच्या वारसदारांना कदमांचे नेतृत्व मान्य करण्याची वेळ का आली? दादा घराण्यातच दोन गट आहेत. एक वसंत बंगल्यावरून स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना मानणारा आणि दुसरा कारखान्यासमोरील साई बंगल्यावरून आदेश मानणारा. आता घरातील गटबाजी संपली असल्याचे सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत दाखवून दिले. आता कदम गटाशी असलेला दुरावा संपल्याचे निदान जाहीर पणे सांगितले असले तरी येणार्‍या काळात दिसले पाहिजे.

आतापासूनच काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. सांगली लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमण करण्याच्या तयारीत असताना काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली. यामुळे जागेवरील हक्क कायम राहीलच असेही नाही. कारण महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाची बोलणीही झालेली नाहीत. गेल्यावेळी काँग्रेसने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देत असताना उमेदवारही उसनवारीवर दिला होता. आता पुन्हा नव्याने मांडणी करावी लागणार नसली तरी पारंपारिक काँग्रेसच्या मतदारांना विश्‍वास देण्याची गरज आहे. आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला विश्‍वासात घेतले तरच भवितव्य आहे, अन्यथा, कारखाना गेस्ट हाउसच्या चार भिंतीमध्ये बसून राजकीय डावपेच आखणे म्हणजे विकासाचे राजकारण असा भ्रम मतदारांनी करून घ्यावा असे म्हणणे म्हणजे शत्रू पुढे दिसताना वाळूत मान खुपसणार्‍या शहामृगासारखी अवस्थाच.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.