Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील खानापूर घाटमाथ्यावर मिळतो चक्क हवेवर पिकवलेला गहू!

सांगलीतील खानापूर घाटमाथ्यावर मिळतो चक्क हवेवर पिकवलेला गहू! 


सांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथ्यावर केवळ एका पावसाच्या पाण्यावर कुठल्याही खत आणि औषधांशिवाय चक्क हवेवर पिकत असलेला गहू येतो. घाटमाथ्यावरचे हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या आधारे हा गहू पिकवला जातो. या भागात या बिनपाण्याच्या गव्हाला शेत गहू किंवा हवेवरचा गहू म्हणतात. खानापूरच्या घाटमाथ्यावरच्या या गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ जमिनीत असणाऱ्या ओलीवर हा गहू येतो.

केवळ गार हवेवर गहू पिकतो

एका पावसाच्या पाण्यावर कुठल्याही खत आणि औषधांशिवाय खानापूरच्या घाटमाथ्यावर केवळ गार हवेवर गहू पिकतो. या गव्हाला शेत गहू किंवा हवेवरचा गहू म्हणतात. खानापूर घाटमाथ्यावर काही मोजक्या क्षेत्रात तेथील हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या जीवावर हा गहू पिकतो. त्यामुळे हा वैशिष्ट्यपूर्ण गहू मानला जातो. या गव्हाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ जमिनीत असणाऱ्या ओलीवर येतो. पुन्हा पाणी द्यावं लागत नसल्याने एकदा पेरल्यानंतर काढायलाच जायचे, असा काहीसा प्रकार याबाबतीत होतो.

विशेष म्हणजे दुष्काळी, कमी पावसाच्या इतर कुठल्याही पट्ट्यापेक्षा खानापूर घाटमाथ्यावर या गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. एक तर या पिकाला मध्यम स्वरुपाची जमीन लागते आणि वातावरण कोरडे असले तरी गारवा आवश्यक असतो. या दोन्ही गोष्टी खानापूर घाटमाथ्यावरील रेणावी, रेवणगाव, घोटीखुर्द, घोटी बुद्रुक घोडेवाडी, ऐनवाडी, पोसेवाडी, जाधववाडी, तामखडी अडसरवाडी या घाटमाथावरील गावच्या शेतामध्ये मिळतात. खानापूर घाट माथ्यावर 8 ते 10 गावांत मिळून किमान 125 ते 150 एकरात या शेत गहू पिकाचे उत्पन्न घेतले जातो. त्याला 'हवेवरचा गहू' असंही म्हणतात. इतर सर्व गव्हांच्या वाणा पेक्षा हा वेगळा असतो. या शेतगव्हाचा बाजार भाव सुद्धा इतर गव्हाच्या तुलनेत जास्तीचा असतो.

शेत गव्हाची वैशिष्ट्ये

या गव्हाच्या चपात्या किंवा पोळ्यांचा रंग लालसर असतो. त्या अत्यंत मऊ, स्वादिष्ट आणि पचायला हलक्या तसेच आरोग्यास चांगल्या असतात. याचे बियाणे स्वतंत्रपणे या भागातील शेतकऱ्यांकडे संरक्षित केलेले आहे.

शेत गव्हाची पेरणी होते कधी?

साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटाला म्हणजे दसरा झाल्यानंतर या गव्हाची पेरणी केली जाते. त्यानंतर साडेचार ते पाच महिन्यात हे पीक येते. थंडीच्या दिवसातील वातावरण या पिकाला पोषक असते. रब्बी हंगामात जमिनीतल्या ओलीवर येणारा हा गहू आहे. त्यासाठी एकदाही पाणी द्यावे लागत नाही. एकरी 20 किलो गव्हाचे बियाणे लागते. त्यात एरवी 5 ते 6 क्विंटल (कधी कधी 6 ते 7 पोतीसुद्धा) उत्पन्न निघते. हे वाण दुर्मिळ असल्यामुळे सध्या परंपरागत काही लोकांकडेच उपलब्ध आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.