जयंत पाटलांचा निशाणा काळ बदलला न्याय बदलला..
उद्धव ठाकरे यांनी आठ लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली आहे. मात्र, तरीही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळं सुप्रीम कोर्टही पक्षच शिंदेंचा असल्यानं निलंबनाचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं म्हणू शकते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पक्ष पळवणे हा तर दिवसा दिवसा-ढवळ्या घातलेला दरोडाच असल्याचे पाटील म्हणाले.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध वॉर्डातील विकासकामांचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. काळ बदलला आहे. न्याय बदलला आहे. जे न्याय देतील अशी अपेक्षा असते तेच डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देत आहेत असे लोकं म्हणत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. एक पक्षच पळवण्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरु असल्याचा घणाघात जयंत पाटलांनी केला. आता न्याय जनतेच्या न्यायालयातच जाऊन करावा लागेल. इंदिरा गांधी यांचा याच जनतेने पराभव केला आणि याच जनतेने त्यांना डोक्यावर बसवले असेही जयंत पाटील म्हणाले.
फैसला जनतेच्या न्यायालयात जाऊनच करावा लागेल
देशात कायदा आहे की नाही याची शंका आता लोकांच्या मनात येत आहे. जे न्याय देणारे आहेत, तेच डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देत आहेत असे जयंत पाटील म्हणाले. आठ लाख कागदपत्र उद्धव ठाकरेंनी देऊनही निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजून दिला आहे. निकाल देताना आमदारांच्या संख्येचा विचार केल्याचे जयंत पाटील म्हणाले. निकालाचेही काम पूर्ण झाले नाही. पण आम्हाला कोणीतरी सांगत आहे म्हणून लवकर निर्णय केल्याचे जयंत पाटील म्हणाले. न्याय आहे किंवा नाही याचा फैसला जनतेच्या न्यायालयात जाऊनच करावा लागेल असे जयंत पाटील म्हणाले.
कमळाकडे लांबून पाहावं, जवळ घेऊ नये
देशातील जनता फार हुशार आहे. देशात जे चालले आहे ते बरोबर नाही. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत सत्ताधारी काही बोलत नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. देशातील सरकारला जेव्हा अपयश येत तेव्हा धर्माचा आधार घेतला जातो. त्यामाध्यमातून टोकाच्या भावना निर्माण केल्या जातात. लोकांना संघटीत करायचे त्यामुळं लोक बाकीचं सगळं लोक विसरुन जातात असे जयंत पाटील म्हणाले. सगळ्याच क्षेत्रात सामान्य माणसाला पिडण्याचे काम होत असेल तर नागरिकांनी सावध होण्याचे काम केलं पाहिजे. ज्या फुलातून वास येतो त्याला फूल म्हटलं पाहिजे. कमळाकडे लांबून पाहावं. दिसायला चांगले असले तरी जवळून घेऊन वास घेऊ नये असे जयंत पाटील म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.