Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कामगार साहित्य संमेलन मिरज येथे 24 व 25 फेब्रुवारीला..

कामगार साहित्य संमेलन मिरज येथे 24 व 25 फेब्रुवारीला..


साहित्य संमलनातील उपक्रम, कार्यक्रमांना व्यापक प्रसिध्दी देण्याचे  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्तांचे आवाहन संमेलनासाठी ३ हजार कामगार व कामगार कुटुंबियांनी नाव नोंदणी


सांगली दि. 22  : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत आयोजित 17 वे कामगार साहित्य संमेलन बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे 24 व 25 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर असून स्वागताध्यक्ष म्हणून कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे स्थान भूषवणार आहेत. या साहित्य संमेलनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून ३ हजार कामगार व कामगार कुटुंबियांनी नाव नोंदणी केली आहे. कामगार साहित्य संमेलनामध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांना आणि कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी आज मिरज येथे पत्रकार परिषदेत केले.

शुक्रवार, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.45 वाजता ग्रंथदिंडी निघणार असून ही ग्रंथ दिंडी मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मंगळवार पेठ, सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महापालिका कार्यालय, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रवेशद्वार मार्गावरून बालगंधर्व नाट्यमंदिर येथे येणार आहे. ग्रंथ दिंडी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे पोहोचल्यानंतर सकाळी 9:30 वाजता विंदा बालमंचाचे उद्घाटन, डॉ. शंकरराव खरात ग्रंथदालनाचे उद्घाटन, लोकशाहीर पट्टे बापूराव कविता भिंतीचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार आहे.

17 व्या कामगार साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्याहस्ते व संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर,  कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कामगार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेध सिंगल, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज येळवे  यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये दिनांक 24 रोजी दुपारी 12 ते 1.30 या वेळेत चला उद्योजक होऊया या विषयावर डॉ. विठ्ठल कामत, रामदास माने, हनुमंतराव गायकवाड, गिरीश चितळे यांची मुलाखत मिलिंद कुलकर्णी घेणार आहेत. दुपारी 2.30 ते 4 या वेळेत कामगार चळवळीची कथा आणि व्यथा या विषयावर परिसंवाद होणार आहे.  हा परिसंवाद भारतीय मजदूर संघाचे ॲड.अनिल ढुमणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून सीटूचे डॉ. डी. एल. कराड, हिंदू मजदूर सभेचे संजय वढावकर आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अविनाश दौंड सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालनाचे  श्रीमती प्रतिमा जोशी काम पाहणार आहेत. 4.30 ते 6 या वेळेत व्यसन मुक्तीची लढाई या विषयावर परिसंवाद होणार आहे. 

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुणे च्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होणार आहे. तर नागपूर येथील मैत्रेयी व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक तुषार नातू, मेंढी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील नवोदय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गीते आणि राज्य व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त बाळासाहेब बाणखेले सहभागी होणार आहेत. या परिसंमताचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. आणि  सायं. 6 ते 7.30 या वेळेत मराठी साहित्यात कामगार जीवनाचे चित्र शोधताना या विषयावर वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात डॉ. कुमार अनिल, मुंबई, डॉ. श्रीपाद जोशी, सांगली, डॉ. प्रभाकर ओव्हाळ, वडगाव, मावळ सहभागी होणार असून अविनाश सप्रे हे सूत्रसंचालन करणार आहेत. 7.30 ते 8.30 या वेळेत  उद्धव कानडे यांच्या अध्यक्षतेखाली काव्यधारा हा कवी संमेलनाचा कार्यक्रम होणार असून यामध्ये मान्यवर कवी सहभागी होणार आहेत या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अरुण म्हात्रे हे करणार आहेत.

दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते ११ या वेळेत  श्रीमती अंजली कुलकर्णी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली काव्य मैफल- कविता श्रमाची  या विषयावर कवी संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन नाशिकचे संजय चौधरी हे करणार आहेत. सकाळी 11 ते 12.30 या वेळेत आम्ही का लिहितो?  या विषयावरील परिसंवाद विश्वास वसेकर, परभणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. परिसंवादात श्रीमती सुनीताराजे पवार, श्रीमती कल्पना दुधाळ, देविदास सौदागर, संतोष नारायणकर आणि सुनिल उबाळे सहभागी होणार आहेत. दुपारी 1.30 ते 3 या वेळेत प्रा. आप्पासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन कार्यक्रम होणार आहे. यामध्ये बाबा परीट, जयवंतराव आवटे, विश्वनाथ गायकवाड सहभागी होणार असून कथाकथनाचे सूत्रसंचालन मनोहर धोत्रे करणार आहेत.

दुपारी 3 ते 4 अभिरूप न्यायालय हा उपक्रम होणार आहे. यामधे पद्मश्री पोपटराव पवार,  महाराष्ट्र कामगार मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, राजेंद्र वाघ, उध्दव कानडे, श्रीकांत चौगुले, अरुण म्हात्रे पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. मुकुंद कुळे, श्रीमती सुनिता राजे पवार, बाळासाहेब  बाणखेले,  सुदाम भोरे, बाजीराव सातपुते, सुरेश कंक, अरुण गराडे आणि प्रभाकर वाघोले  हे वेगवेगळ्या भूमिकेत सहभागी होणार आहेत. 

सायंकाळी 4 ते 6 या वेळेत कामगार साहित्य संमेलनाचा सांगता समारंभ होणार आहे. सांगता समारंभ कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, स्वागत अध्यक्ष तथा कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी हे उपस्थित राहणार आहेत. सांगता समारंभ कार्यक्रमानंतर सायंकाळी ६ वाजता भूपाळी ते भैरवी हा महाराष्ट्रातील लोकगीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त श्री. इळवे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.