Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत..

जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत..


माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत आले असल्याचं दिसत आहे. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून यावेळी एका महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण  समोर आले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण, आठवडाभरात दुसरा गुन्हा

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. संध्याकाळी नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभात ही घटना घडल्याचा दावा एका 40 वर्षीय एका महिला सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. या महिलेचा दावा आहे की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. यावेळी त्यांनी तिला तक्रार दाखल करण्याचे सुचवले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.

वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये 'हर हर महादेव' हा मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाणे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आव्हाड यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि भादंविच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित तथ्यांचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जामीनावर जामीन मंजूर केला होता.

"शिवाजी महाराजांसाठी फाशी झाली तरी चालेल" - आव्हाड

'हर हर महादेव' या सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये शो बंद पाडला. आजही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. पुढील भूमिकेविषयी भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "शिवाजी महाराजांसाठी फाशी झाली तरी चालेल. महाराजांसाठी हा मावळा कधी शांत बसणार नाही. महाराजांसाठी मावळा सदैव लढणार."


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.