विधानभवनात येताच उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत मोठं वक्तव्य
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज विधिमंडळात बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. या बैठकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. आता मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात आली होती.
महाविकास आघाडी सरकारने करोनासारख्या संकटाचा मुकाबला केला आहे. करोनाचे संकट हे संपूर्ण जगावर आले होते. त्या संकटापुढे सध्याचे संकट काहीच नाही. या संकटाचा देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुकाबला करू. आपल्याला संघर्ष करायचा असून न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे.
कायद्यासमोर सर्व सारखे असतात. त्यामुळे न्यादेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. परंतु, जनता उघड्या डोळ्यांनी सर्व पाहात असते. न्यायदेवता आणि जनता ही लोकशाहीची मोठे धारस्तंभ आहेत. हे दोन्ही खांब जोपर्यंत मजबूत आहेत, तोपर्यंत देशात लोकशाही राहील. आम्ही देशात बेबंदशाही येऊ देणार नाही, असा अप्रत्यक्ष निशाणा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर साधला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.