संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला; न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी काही दिवस वाढला आहे. संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुन्हा 5 सप्टेंबरपर्यंत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात येणार आहे.
पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. तिथे ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती.
आज पुन्हा त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं समन्स बजावलं होतं. त्यांचीही चौकशी करण्यात आली. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी थेट हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले.
अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते, असा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.