काही काळ थांबा, 'पुन्हा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल'
मुंबई : बंडखोर आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण तसेच शिवसेना व्हीप प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता त्यांनी आपली निरीक्षणे मांडली.
अरुणाचल प्रदेशात अशीच घटना झाली होती. राज्यपालांचे सर्व निर्णय त्यावेळी न्यायालयाच्या खंडपीठाने बदलले. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यात आले. असेच महाराष्ट्रात घडत आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई आज जे म्हणतात, तेच कालांतराने खरे होण्याची शक्यता आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी आणि विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी ज्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेचा व्हीप झुगारून मतदान केले आहे, त्याबाबत खंडपीठ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. खंडपीठ नेमणे ही सर्वोच्च न्यायालयाची कृती गंभीर आहे. सभागृहात जे घडले ते सर्व सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे, हा संदेश यातून मिळतो.
पाच न्यायाधीशांचे खंडपीठ तयार झाल्यावर या सगळ्याचा उलगडा होईल. काही काळ लागेल. देर है मगर अंधेर नही. दोन चार महिने गेल्यानंतर याचा निकाल लागेल. पुन्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल, अशी शक्यता जयंत पाटील यांनी वर्तवली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.