मुलांच्या भांडणात पालकही पडले, नंतर मिटवामिटवी केली; आता उच्च न्यायालयाने दिली ही मोठी शिक्षा
नवी दिल्ली : लहान मुलांच्या भांडणात पडू नये असे म्हणतात. पण, तसे झाले तर काय होते याचा मोठा प्रत्यय दोन कुटुंबांना आला आहे. मुलांच्या भांडणात त्यांचे पालकही अडकले आणि प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. यमुना नदीची ४५ दिवस स्वच्छता करण्याच्या अटीवर दाखल करण्यात आलेला खटला दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
मुलांमध्ये खेळताना मारामारी झाली. यानंतर मुलांचे पालकही या वादात अडकले आणि हाणामारीपर्यंत परिस्थिती पोहोचली. यानंतर पोलिसांनी ममता देवी आणि इतरांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण थेट उच्च न्यायालयात गेले. दोन्ही पक्षांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांच्यात हे प्रकरण मिटले आहे, अशा परिस्थितीत दाखल झालेला खटला फेटाळण्यात यावा. दोन्ही पक्षांनी न्यायालयात सांगितले की, हा वाद वाढवल्याबद्दल त्यांना खूपच पश्चाताप होत आहे.
न्यायमूर्ती जसमीत सिंह म्हणाले की, केवळ आरोपींनाच नाही तर तक्रारकर्त्यांनाही यमुना नदी स्वच्छ करावी लागेल. न्यायालयाने पक्षकारांना (आरोपी आणि तक्रारदार) दिल्ली जल बोर्ड टीम सदस्य (ड्रेनेज) अजय गुप्ता यांच्या देखरेखीखाली ४५ दिवस नदी स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. सफाईचे काम समाधानकारक झाल्यानंतर जल बोर्ड आरोपी आणि तक्रारदारांना यमुना स्वच्छतेचे प्रमाणपत्र देईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रमाणपत्र मिळाल्यापासून आठवडाभरात ते न्यायालयीन रेकॉर्डमध्ये सादर करावे लागते.
उच्च न्यायालयाने आरोपी आणि तक्रारदाराच्या बाजूच्या लोकांनी जल बोर्ड, ड्रेनेजच्या सदस्यांची 10 दिवसांत भेट घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नदी स्वच्छतेचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या अटीवर हायकोर्टाने फेब्रुवारी 2022 मध्ये जैतपूर पोलिस ठाण्यात मारहाण, मारामारी, विनयभंग आणि इतर आरोपांबाबत दाखल झालेला गुन्हा फेटाळून लावला. ममता देवी आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.