Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरची व बेदाणा ‘जीएसटी’ मुक्त करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवू - नाम. अजितदादा पवार

 मिरची व बेदाणा ‘जीएसटी’ मुक्त करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवू - नाम. अजितदादा पवार 


सांगली :
अलीकडेच बाजारातील हळद सौदे मुक्त करण्याचा व हळद शेतीमाल असल्याचे मान्य केल्याचा निर्णय जीएसटी लवादाने दिला होता. या कामी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जीएसटी परिषदेचे सुधारणा समिती प्रमुख नाम. अजितदादा पवार यांनी केलेले सहकार्य व घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे याला यश आले आहे. यास्तव बुधवार दिनांक १५ जून २०२२ रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची चेंबर ऑफ कॉमर्स शिष्टमंडळाने भेट घेऊन मार्केट यार्डात विक्री होणार्‍या हळदीवरील जीएसटी बंद केल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच हळदी प्रमाणे मिरची व बेदाणा हा शेतमाल असून मार्केट यार्डमध्ये अडत्यांकडून विकल्या जाणाऱ्या या शेतमालाला जीएसटी पासून मुक्त करावे अशी विनंतीही करण्यात आली. 

यावर अजितदादांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यामध्ये जलसंपदा तथा पालकमंत्री मा. जयंत पाटील यांचे देखील सहकार्य लाभले. याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, उपाध्यक्ष दीपक चौगुले, राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील - मजलेकर, शरद पाटील, सौरभ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  सुरेश पाटील म्हणाले, बाजारातील हळद सौदे करमुक्त करण्याच्या लवादाच्या या निर्णयामुळे सांगली बाजारपेठेला आणखी उभारी मिळणार असून इथून पुढे संपूर्ण देशभरातून आवक झालेल्या हळदी मालाचा स्टॉक येथील सांगली मध्ये होऊ शकेल. ५ ते ६ महिने शेतकऱ्यांच्या मालाच्या जीएसटीचे पैसे व्यापाऱ्यांकडे अडकून पडत होते. त्यामुळे पर्यायी शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नव्हता. २०१७ पासून शेतकरी व व्यापाऱ्यांवर असलेले जीएसटीचे जोखड या निर्णयामुळे दूर झाले असून, हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळदी वरील जीएसटी कमी करण्यात आले असल्याने हळद दर वाढीस मदत होईल. 

तसेच ते म्हणाले, दरवर्षी व्यापाऱ्यांचा माल येथे पाच ते सहा महिने ठेवला तर त्यांना ५ % जीएसटी भरावा लागत होता. त्यामुळे कोट्यावधी पर्यंतचे नुकसान व्यापाऱ्यांना होत होते.  त्यामुळे शेतीमालाला दर कमी मिळत होता. मार्केटयार्डात जवळपास ५०० अडते काम करत असून या सर्वांना रजिस्ट्रेशन करणे, जीएसटी भरणे, रिटर्न भरणे त्याच्या अनुषंगाने इतर कामासाठी अंदाजे ५ ते ७ कोटी खर्च करावा लागत होता. या निकालाने व्यापाऱ्यांच्या खर्चात २० कोटींची बचत होणार आहे. त्याबरोबरच येथून माल एक्सपोर्ट होत असताना ५ % टॅक्स भरावा लागत होता. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात निर्यात होत नव्हती. आता जर डायरेक्ट एक्सपोर्ट झाला तर, त्यांना फक्त शेकडा दहा पैसे द्यावे लागेल व  जीएसटी ही भरावा लागणार नसल्याने सांगलीतून देशभरात निर्यातिचा वेग वाढणार आहे.

सांगलीची हळद बाजारपेठ चांगल्या दरासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे नांदेड, मराठवाडा याभागातून मोठ्या प्रमाणात आवक होऊ शकते. त्याचप्रमाणे हळद एक्सपोर्ट करणारे उद्योग कंपन्या आहेत, त्यांना संधी प्राप्त होऊन, संपूर्ण एक्सपोर्ट हाउसेस येथे उघडली जातील. त्यामुळे इथून पुढे संपूर्ण सांगली बाजारपेठेला हळदीसाठी नवीन सुवर्णद्वार उघडले जाईल. यात शंका नाही. हळदीवर जीएसटी रद्द करण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जादा प्रमाणात दर मिळणार असून, लवकरच मिरची  व बेदाणा शेतीमाल असून त्यावर जीएसटी रद्द करण्याचे दिलेले आश्वासन यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाम. अजितदादांनी घेतलेल्या या निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रभर स्वागत  व कौतुक होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.