Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता वाहतूक पोलिस विनाकारण वाहन चालकांना थांबवून तपासणी करु शकणार नाहीत

 आता वाहतूक पोलिस विनाकारण वाहन चालकांना थांबवून तपासणी करु शकणार नाहीत


मुंबई : आता वाहतूक पोलिस विनाकारण वाहन चालकांना थांबवू शकणार नाहीत, तसेच कारण नसताना गाडीची तपासणीही करू शकत नाहीत. यासाठी आदेशही जारी करण्यात आला आहे. याबाबत पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी वाहतूक शाखेला परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकानुसार, वाहतूक पोलिस वाहनांची तपासणी करणार नाहीत. विशेषत: जिथे तपासणी नाके आहेत. ते केवळ वाहतुकीवर लक्ष ठेवतील आणि वाहतूक सामान्यपणे सुरू राहिल याकडे लक्ष केंद्रित करतील. ते एखादे वाहन तेव्हाच थांबवू शकतील, जेव्हा वाहतुकीच्या वेगावर त्याचा परिणाम होत असेल, असे अध्यादेशात म्हटले आहे. अनेकदा वाहतूक पोलिस संशयाच्या आधारावर वाहने रोखतात आणि तपासणी करतात त्यामुळे महामार्गावर वाहनांचा खोळंबाही होतो.

रस्त्यांवरील वर्दळ वाढत असल्याने वाहतूक पोलिसांना वाहनांची तपासणी बंद करण्यास सांगितले असून, वाहतुकीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास प्राधान्य देण्यासही सांगण्यात आले आहे. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दंड आकारला जाऊ शकतो, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त नाकाबंदीदरम्यान, वाहतूक पोलिस केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतील आणि वाहनांची तपासणी करणार नाहीत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास संबंधित वाहतूक चौकीचे वरिष्ठ निरीक्षक जबाबदार असतील.

वाहतूक पोलिसांनी संशयाच्या आधारे वाहनांचे बूट तपासू नयेत, त्यांना अडवू नये, असे वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जवान पूर्वीप्रमाणेच वाहतूक गुन्ह्यांवर चालान देत राहतील आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखतील, असे ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.