Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकार स्मारकाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याहस्ते लोकार्पण

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकार स्मारकाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याहस्ते लोकार्पण



राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मानवतेच्याही मानबिंदू - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक श्रध्देचे आणि विश्वासाचे प्रतिक  - पालकमंत्री जयंत पाटील

सोलापूर विद्यापीठात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व अध्यासन होणार

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत


सांगली, दि. 2,  : देशात ज्या कर्तुत्चवान महिला होवून गेल्या त्या नामावलीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नेहमीच श्रेष्ठ आहे. त्या सामान्य कुटूंबातून आल्या आणि राज्यकर्त्या झाल्या. त्यांनी समाजातील गरीब वर्गाला आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी राज्यकारभार केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शरद पवार यांनी केले. 

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन समाजासाठी क्रांतीदर्शी असून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभे केलेले त्यांचे स्मारक समतेचे व न्यायाचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचारांचा वारसा घेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्ह्यात आणि राज्यात आपण काम करत आहोत असे सांगून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेले त्यांचे स्मारक हे श्रध्देचे आणि विश्वासाचे प्रतिक असल्याचे सांगितले.  

सांगली शहरात रघुवंश सोसायटी, शाहूनगर,‍ विजयनगर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार श्रीनिवास पाटील, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार अरूण लाड, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षे दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस,      उपमहापौर उत्तम पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार रामहरी रुपनर, माजी आमदार सदाशिव पाटील, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विश्वास नाना देवकाते, उत्तमराव जानकर, प्राध्यापक यशपाल भिंगे, उस्मानाबादच्या सक्षना सलगर,  महानगरपालिकेचे पदाधिकारी, आजी व माजी नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिशा दिली, असे सांगून खासदार शरद पवार म्हणाले,  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांनी शेती, उद्योगाबरोरबच विणकामालाही चालना दिली. घाट, धर्मशाळा, मंदिरे यांची निर्मिती केली. आपल्या राज्यात अनेक जाती धर्माचे लोक सलोख्याने रहावेत यासाठी त्यांनी अखंडपणे कटाक्ष पाळला. राजमाता अल्यिादेवी होळकर यांच्या जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. पती, सासरे यांच्या निधनानंतरही त्या डगमगल्या नाहीत. जेंव्हा राज्याची जबाबदारी त्यांच्यावर आली तेंव्हा त्यांनी सामान्य माणसांसाठी राज्य चालविले आणि आदर्श पध्दतीने राज्यकारभार केला. त्यांचा आदर्श घेवून सर्वांनी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत आदर्श राज्यकारभार केला. त्यांचे जीवन समाजासाठी अत्यंत क्रांतीदर्शी आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने केलेले त्यांचे स्मारक समतेचे आणि न्यायाचे प्रतिक आहे. पतीच्या निधनानंतर मिळकतीवरचा पहिला अधिकार हा त्याच्या विधवेचा असेल तसेच विधवेला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे हे त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय अत्यंत क्रांतीकारी आहेत.  मंदिरे, धर्मशाळा, पिण्याचे पाणी यासाठी त्यांनी देशभरात आदर्श काम केले. त्या मानवतेच्याही मानबिंदू आहेत. त्यांचा आदर्श घेवून सरकार काम करीत आहे. धनगर समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, अहिल्यादेवी होळकरांनी हजारो ऐतिहासीक स्थळे, मंदिरे, घाट यांच्या जीर्णोध्दारासाठी आपला खजिना वापरला. आदर्श ग्रंथालय उभे केले. लोकोपयोगी उपक्रम राबविले. त्यांनी आपल्या राज्यात न्याय व्यवस्थाही उत्तम ठेवली. नेहमी समाजाच्या हिताचाच विचार केला. आपली जनता सुखी, समाधानी आणि सुरक्षित रहावी यासाठी कटाक्षाने निर्णय घेतले.  देशात अनेक महिला राज्यकर्त्या झाल्या त्यामध्ये दोन राजमाता मान्यता पावल्या त्यामध्ये राजमाता जिजाऊ आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. त्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाने जगाला आदर्श घालून दिला. त्यांचा आदर्श घेवूनच महाराष्ट्राचे शासन काम करीत आहे. धनगर समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यांचे प्रश्न लवकराच सुटतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  महाराष्ट्रात ज्यांच्या नावे विद्यापीठे आहेत त्यांचे स्मारक विद्यापीठ परिसरात उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक सोलापूर विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात येणार असल्याचे सांगून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे अध्यासनही सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेले स्मारक अप्रतिम असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, महानगरपालिकेने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक हे महाराष्ट्रातील आदर्श स्मारक असून त्यांच्या नावाला साजेशे आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजातील सर्व जाती घटकांच्या विकासासाठी काम केले. शेतकरी, विधवा, गोरगरीब, तरूण यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी राज्यकारभार केला. धनगर समाजातील मुले प्रशासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात यावीत यासाठी या स्मारकाच्या ठिकाणी अभ्यासिका व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कोरोना संकटामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण आला असला तरी धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे आर्थिक निधी देण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे सांगून आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानासाठी अधिकचा निधी देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सोलापूर विद्यापीठात 14 कोटी 50 लाख रूपये खर्चाचे उभारण्यात येत असलेले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम निविदा प्रक्रियेमध्ये असल्याचे सांगितले.

महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी  महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांचे स्मारक सर्व घटकांसाठी उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले, समता प्रस्थापित करण्यासाठी जातीय सलोखा आवश्यक आहे. धनगर समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय उन्नतीसाठी सर्व घटकांनी मदत करणे आवश्यक असल्याचे सांगून आदिवासी समाजासाठी असणाऱ्या योजना धनगर समाजालाही लागू कराव्यात अशी मागणी केली.

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी धनगर समाजाचे प्रश्न एकदिलाने सोडविणे आवश्यक असून धनगर समाजाची आर्थिक परिस्थिती सोडविण्यासाठी आरक्षण, उद्योग व्यवसायाला उर्जितावस्था देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

प्रा. यशपाल भिंगे यांनी होळकर शाहीने अत्यंत कर्तबगार महिला राज्यकर्त्या दिल्या आहेत. यामध्ये तुळसाबाई, भिमाबाई, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही त्यातील ठळक उदाहरणे आहेत. लोकसेवेचे व्रत घेवून अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्षे राज्यकारभार केला. त्यांच्या राजवटीचे समन्वय हे सर्वात मोठे वैशिष्ठ होते.

नगरसेवक विष्णू माने यांनी प्रास्ताविक करताना धनगर समाजासाठी आरक्षण, वसतिगृहे, पशुपालनासाठी गायरान, मेंढपाळावरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावे महामंडळ व त्यासाठी निधी आदि मागण्या केल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.