हा अर्थसंकल्प गोरगरिबांचा नव्हे, तर बड्यांचे खिसे भरणारा -- पृथ्वीराज पाटील
सांगली, दि. १ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्राचा यंदाचा अर्थसंकल्प फसवा आणि गोरगरीब, सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी यांना आणखी गरिबीत लोटणारा आहे. हा अर्थसंकल्प भांडवलदार आणि श्रीमंत लोकांचे खिसे भरणारा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पावर बोलताना ते म्हणाले, साठ लाख नवीन रोजगार आणि ऐंशी लाख घरे सरकार देणार, ही देशातील बेरोजगारांची आणि गरीब लोकांची प्रचंड संख्या लक्षात घेता फार मोठी गोष्ट नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात ठोस असे काहीच नाही. व्यापारी, छोटे, मध्यम उद्योजक, नोकरदारांचाही विचार केला गेला नाही.
ते म्हणाले, आयकर रचनेत बदल होण्याची अपेक्षा होती, परंतु त्यात कुठलाही बदल केला गेला नाही, त्यामुळे करदात्यांनाही दिलासा मिळालेला नाही.
हा अर्थसंकल्प देशाला बलशाली करणारा आहे, असा दावा सत्ताधारी भाजपचे नेते करत आहेत, परंतु यातून बळ तर मिळणार नाहीच, शिवाय ते कमी होणार आहे, असेही श्री पाटील यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.