Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमरावती बंद हिंसाचार प्रकरणी भाजपच्या १४ नेत्यांना अटक

 अमरावती बंद हिंसाचार प्रकरणी भाजपच्या १४ नेत्यांना अटक


अमरावती : आतापर्यंत पोलिसांनी ‘अमरावतीत बंद’मध्ये सहभागी झालेल्या भाजपच्या १४ नेत्यांना ताब्यात घेतले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून आज पहाटे पासूनच भाजपच्या नेत्यांना अटक करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. भाजपचे नेते आणि महापालिकेचे गटनेते तुषार भारती यांना त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली. त्याचबरोबर पोलिसांनी माजी आमदार अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही अटक करुन न्यायालयासमोर हजर केले आहे. एकीकडे शहरात हे अटक सत्र सुरु असतानाच दुसरीकडे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दंगल करणांऱ्या एकालाही सोडणार नसल्याचा थेट इशाराच दिल्यामुळे भाजप नेत्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

१३ नोव्हेंबर रोजी अमरावती बंदची हाक भाजपने दिली होती. पण या बंदला नंतर हिंसक वळण लागले. त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचाराविरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. पण या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानदारांना मारहाण करण्यात आल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता, तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न देखील निर्माण झाला. भाजपने दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी या मोर्चा विरोधात अमरावती शहर बंदचे आवाहन केले. पण आंदोलकांनी या बंद दरम्यान हिंसा केल्याचे पहायला मिळाले. आता याच प्रकरणामध्ये पोलिसांनी भाजपच्या १४ नेत्यांना ताब्यात घेतले आहे.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या अटक सत्राच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, गेल्या तीन दिवसांपासून अमरावतीत तणावपूर्ण शांतता असून काल व आज कुठल्याही प्रकारे गालबोट लागले नसल्याची माहिती दिली. अमरावतीत संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधासाठी दुपारी दोन ते चार या वेळेला परवानगी देण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होईल, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली. अमरावतीमधील चार ते पाच हजार पोलीस वगळता राज्य राखीव दल पोलीस बंदोबस्तसाठी तैनात असल्याचे देखील ठाकूर यांनी यावेळी सांगितले. तसेच दंगल करणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याची भूमिका ठाकूर यांनी स्पष्ट केली आहे.

पोलीस आयुक्त संदिप पाटील यांनी १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेल्या हिंसक घटनांनंतर शहरात कलम १४४ लागू करत कर्फ्यूचे आदेश दिलेत. यानुसार आरोग्यविषयक आणीबाणी वगळता नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यावरही निर्बंध आहेत. हे सर्व निर्बंध कर्फ्यूबाबतचा पुढील आदेश येईपर्यंत लागू असतील. अमरावतीसह नांदेड, मालेगाव, वाशिम आणि यवतमाळमध्ये दगडफेकीचे प्रकार घडले. या प्रकरणात आतापर्यंत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.