तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवल्याने विरोधी पक्षाकडून संताप व्यक्त!
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचं शनिवारी निधन झालं. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे सध्या संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण सिंह यांना अखेरचा निरोप दिला जात असताना तिरंग्यावर भाजपाने पक्षाचा झेंडा ठेवला होता. यावरुन विरोधकांनी नाराजी जाहीर केली असून संताप व्यक्त करत नव्या भारतात हे चालतं का ? अशी विचारणा केली आहे.
झेंडा तिरंग्यावर ठेवणं ठीक आहे का?
तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवल्याने विरोधी पक्ष आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. युथ काँग्रेसचे श्रीनिवास बीव्ही यांनी फोटो ट्वीट करत नव्या भारतात पक्षाचा झेंडा तिरंग्यावर ठेवणं ठीक आहे का? असा सवाल विचारला आहे.
भाजपाचा झेंडा तिरंग्याच्या वरती! स्वयंघोषित राष्ट्रभक्त तिरंग्याचा आदर करत आहेत की अपमान? अशी विचारणा युथ काँग्रेसने ट्विटरवरुन केली आहे.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीदेखील भाजपावर टीका केली आहे. देशापेक्षा मोठा पक्ष, तिरंग्याच्या वरती झेंडा. भाजपा नेहमीप्रमाणे..कोणतीही खंत, पश्चात्ताप, खेद, दु:ख नाही अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.