दरेकरांचा घणाघात; नानांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली, आघाडीत विसंवाद.
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाायाखालची जमीन सरकली आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आघाडीत विसंवाद असून मविआ सरकारमध्ये अविश्वासाचं वातावरण असल्याचं स्पष्ट होतं, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. आघाडी तोडायला कोणीही गेलं नाही. तेच एकमेकांवर आरोप करत आहेत. दुसरीकडे एकत्र असल्याचा कांगावाही करत आहेत. संपूर्ण कोव्हिडच्या काळात या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काय निर्णय घेतला? केंद्राने यांना मदत केली. यांना आपआपसातल्या भांडणातून फुरसत मिळत नाही. त्यांच्यात वाद आहेत. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात सतत काऊंटर करत आहेत, असं दरेकर म्हणाले.
पंकजा मुंडेंचं दबावतंत्र नाही
प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजाताईंकडून कोणतंही दबावतंत्र वापरलं जात नाही. पंकजाताईंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या नाराज नाहीत. काल राष्ट्रीय सचिवांची बैठक होती. त्यासाठी त्या दिल्लीत गेल्या होत्या, असं दरेकर म्हणाले. आपल्या नेत्याला पद मिळावं असं कार्यकर्त्यांना वाटत असतं. ते स्वाभाविक आहे. पण पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांना समजावतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मोदी मनधरणी करणार नाहीत
पंकजा मुंडे यांची पंतप्रधान मनधरणी करणार नाहीत. ते मोठे नेते आहेत, असं सांगतानाच शशिकांत शिंदे यांना आगीत तेल ओतण्याखेरीज दुसरं काम नाही. भाजपने कुणाला मंत्रिपद द्यावं याची काळजी शशिकांत शिंदे यांनी करू नये. नाना पटोले काय बोलतात ते आधी पाहावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राऊतांचा एकच अजेंडा
यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवरही प्रतिक्रिया दिली. तथ्य असेल तर ईडी कारवाई करत असते. संजय राऊत यांना एकच काम आहे. रोज केंद्र सरकारवर रोज टीका करायची हाच राऊत यांचा अजेंडा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.