Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, आता राणेंनी उद्योगांना संजीवनी द्यावी; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

 नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, आता राणेंनी उद्योगांना संजीवनी द्यावी; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया


मुंबई: नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. राणेंकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या परिस्थितीतून आपला देश सध्या चालला आहे… बेरोजगारी, महागाई, आरोग्य या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. मोदींनी पत्ते पिसले आहेत ते बरोबर आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदं आली आहेत. पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडला आहे. अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला मोहरा पडलेला आहे. नक्कीच नारायण राणेंना मंत्री केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग असं खातं त्यांना दिलं. राणेंची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली आहे. अनेक पदं सांभाळली आहेत, असं सांगतानाच राणेंपुढे रोजगार वाढवण्याचं मोठं काम किंवा आव्हान आहे, असं राऊत म्हणाले.

क्षमता पाहूनच मंत्रिपदं दिली असतील

अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवून मोदी सरकारने नव्या चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे. अर्थात त्यांची क्षमता पाहूनच त्यांना जबाबदारी दिली आहे. या मंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं. मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचं आव्हान राणेंसमोर आहे. रोजगार निर्मितीचं काम त्यांच्या पुढे आहे. हा व्यक्तिगत टीका टिप्पणीचा विषय नाही. राणे चांगले काम करतील. ते महाराष्ट्रात उद्योग आणतील असा विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.

मूळ चेहरा शिवसेना-राष्ट्रवादीचाच

एकमात्र भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असा चिमटहा त्यांनी काढला.

तर हा घटनेचा भंग

शिवसेनेला कोकणात फटका देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं आहे का?, असा सवाल राऊत यांना करण्यात आला. राऊत यांनी ही शक्यता फेटाळून लावली. शिवसेनेला फटका देण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिलं असेल तर हा मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. मंत्रिपदं ही देशाची सेवा करण्यासाठी दिली जातात. शिवसेनेला फटका देण्यासाठी, राष्ट्रवादीला फटका देण्यासाठी किंवा विरोधकांना फटका देण्यासाठी मंत्रिपदाची खिरापत वाटली जात नाही. तसे असेल तर हा घटनेचा भंग आहे, असं सांगतानाच शिवसेनेला फटका देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. देशाचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी मंत्रिपद दिलं जातं. त्या व्यक्तिचं योगदान पाहून मंत्रिपद दिलं जातं, असं त्यांनी स्पष्ट केलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.